वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: खडकवासला धरणसाखळीतील धरणक्षेत्रात रविवारी (दि. 3) सकाळपासून पावसाची रिमझिम, तर डोंगरी पट्ट्यात अधूनमधून सरी पडत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात प्रथमच धरणसाखळीतील पाणीसाठ्यात किंचित भर
पडली आहे. साखळीत रविवारी सायंकाळी पाच वाजता 2.60 टीएमसी म्हणजे 8.93 टक्के साठा झाला होता. शनिवारी सायंकाळी पाच वाजता साखळीत 2.52 टीएमसी म्हणजे 8.64 टक्के साठा होता. पाणीसाठ्यात 0.08 टीएमसी इतकी किंचित भर पडली आहे.
पानशेत -वरसगाव धरणखोर्यातील रायगड जिल्ह्यालगतच्या दापसरे, तव, शिरकोली, ठाणगाव परिसरात रिमझिमीनंतर अधूनमधून चांगल्या सरीही पडत आहेत. मात्र, जोरदार पाऊस पडत नाही. दिवसभरात पानशेत येथे 6, वरसगाव येथे 4, टेमघर येथे 10 व खडकवासला येथे 2 मिलिमीटर पाऊस पडला. गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण दहा टक्केही नाही. त्यामुळे अद्यापही पाणीसाठा अल्पपातळीवर आहे. गेल्या वर्षी 3 जुलै रोजी धरणसाखळीत 8.70 टीएमसी म्हणजे 29.86 टक्के पाणी होते.