कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : दोन ते तीन वर्षांपासून सारसबाग-कृष्णानगर ही पीएमपी बस बंद असल्यामुळे, कृष्णानगर परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. खिशाला न परवडणार्या वाहनातून लोकांना प्रवास करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांना स्कूल बसशिवाय पर्याय उरला नसून, सर्वसामान्य पालक जेरीस आले आहेत.
कृष्णानगरमध्ये सर्वसामान्य नागरिकांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. अनेक जण मिळेल ते काम करीत, रोजंदारी करीत आपला उदरनिर्वाह करतात. अशा लोकांना खासगी वाहतूक येण्या-जाण्यासाठी परवडत नाही. सारसबाग ते महंमदवाडी, कृष्णानगर ही बस सुरू करण्यात आली. त्या वेळी या बसला प्रवाशांची संख्या चांगली होती.
विद्यार्थांना या बसमुळे येणे-जाणे सुरक्षित होते. मात्र, बस बंद झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी पुरतेच अडचणीत आले आहेत. त्यांना खासगी वाहनांना जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून या मार्गावर बसथांबे उभे केले, काही बसथांबे सडून गेले आहेत.
प्रवाशांसाठी काही बसथांब्यांचा वापर होत नसला, तरी त्याचा जाहिरातीसाठी उपयोग होताना दिसतो. प्रवाशांची ससेहोलपट थांबविण्यासाठी या मार्गावर बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.