वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील अतिमागास व अतिदुर्गम तालुका असलेल्या वेल्हे तालुक्यात केंद्र सरकारच्या मिशन 500 च्या अंतर्गत भारत दूरसंचार निगमचे 'फोर जी मोबाईल टॉवर' उभे राहणार आहेत. त्यासाठी दूरसंचार निगमच्या पुणे विभागाच्या वतीने संबंधित गावांत तांत्रिक बाबी तसेच जागेची पाहणी करण्यात येणार आहे. वेल्हे तालुक्यात ठरावीक गावांचा अपवाद वगळता कोणत्याही कंपनीच्या मोबाईल फोनला रेंज नाही. राजगड, तोरणा, पानशेत, घिसर, वरसगाव अशा दुर्गम भागातील गावे वाड्यावस्त्यांत फोर जी मोबाईल टॉवर बसविण्यात यावेत, अशी मागणी पानशेत वरसगाव धरणग्रस्त कृती समितीचे निमंत्रक अमोल पडवळ यांनी केली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून बहुतांश वेल्हे तालुका दळणवळणाच्या सुविधांपासून वंचित आहे. हा दुर्गम भाग मोबाईल रेंजपासून वंचित आहे.
मोबाईलला रेंज नसल्याने विद्यार्थ्यी तसेच शासकीय योजनांचा ऑनलाइन लाभ घेण्यासाठी रहिवाशांना, स्थानिक नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ऑनलाइन शिक्षण, बँकिंग व इतर सुविधांपासून वर्षानुवर्षे खेडीपाडी वंचित आहेत. दूरसंचार निगमने बीएसएनएल फोर जी टॉवर उभारण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.