पुणे : पुढारी वृत्तसेवा : जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील एका हॉटेल आणि चित्रपटगृहाच्या भूसंपादनाबाबत दिलेली स्थगिती बुधवारी उच्च न्यायालयाने उठविली. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणातील शेवटचा अडथळा दूर झाल्याने रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. पिंपरी हद्दीत दापोडीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, पुणे महापालिका खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीमध्ये भूसंपादनाअभावी 2.1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण होऊ शकले नव्हते. हा रस्ता अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रज) 42 मीटर रुंदीचा अपेक्षित आहे. मात्र, लष्कराच्या ताब्यात जागा असल्याने तो 21 मीटर रुंदीचा होता. लष्कराने महापालिकेच्या ताब्यात जागा दिल्यानंतर पथ विभागाने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.
प्रामुख्याने बोपोडी ते खडकीदरम्यान असलेल्या वसाहती आणि मिळकतींच्या भूसंपादनामुळे दीर्घकाळ रुंदीकरण लटकले होते. प्रशासनाने प्रयत्न करून निवासी मिळकती ताब्यात घेतल्या आणि त्या ठिकाणी रुंदीकरणही केले. मात्र, स. नं. 105 येथील पंजाब हॉटेल आणि जयहिंद चित्रपटगृह या कॅन्टोन्मेंट बोर्डने लीजवर दिलेल्या वास्तूंच्या मोबदल्याच्या रकमेवरून वाद होते. प्रशासनाने त्रयस्थ संस्था म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही मूल्यमापन करून घेतले होते. परंतु, हे मूल्यमापन मान्य नसल्याने पंजाब हॉटेलचे संचालक महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. जयहिंदचे संचालकही या याचिकेत प्रतिवादी होते. उच्च न्यायालयाने या भूसंपादनाला स्थगिती दिली होती.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठासमोर आज यावर सुनावणी झाली. न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाने मूल्यमापन केल्यानुसार मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश देतानाच भूसंपादनावरील स्थगिती उठविली. महापालिकेच्या वतीने अॅड. अभिजित कुलकर्णी आणि पुणे कॅन्टोन्मेंटच्या वतीनेही त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली, अशी माहिती महापालिकेच्या विधी सल्लागार निशा चव्हाण यांनी दिली. या वेळी पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर हेही न्यायालयात उपस्थित होते.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पंजाब हॉटेल आणि जयहिंद चित्रपटगृहासमोरील रस्तारुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण यापूर्वीच करण्यात आले आहे. केवळ येथील भूसंपादनामुळे काम रखडल्याने या मार्गावरील वाहतूक खडकी बाजार येथून वळविण्यात आल्याने वाहतूक संथ होऊन कोंडीत भर पडत होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भूसंपादनाची प्रक्रिया लवकर करून रस्तारुंदीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी दिली. मागील आठवड्यात न्यायालयाने गणेशखिंड रस्तारुंदीकरणात बाधा ठरणारे वृक्ष काढण्यावरील स्थगिती उठविली. पाठोपाठ आज जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी महाापलिकेच्या विधी आणि पथ विभागाने विशेष प्रयत्न केले.
हेही वाचा