खोर; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील पाटस, कानगाव, कडेठाण व खुटबाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल मंजूर करण्यासंदर्भात आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्य सरकार याबाबतीत केंद्र सरकारकडे शिफारस करणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
दरम्यान, दौंड तालुक्यातील कानगाव व कडेठाण, खुटबाव, पाटस येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी कुल यांनी विधानसभेत केली होती. सध्या या ठिकाणी भुयारीमार्गाचे काम सुरू आहे. या भुयारीमार्गात सतत पाणी साचते. यामुळे येथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे असल्याचे कुल यांचे म्हणणे आहे. कुल म्हणाले की, शासनाने सर्व मानवयुक्त रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी मान्यता दिली आहे.
सदर योजनेंतर्गत दौंड तालुक्यातील कडेठाण व कानगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. परंतु, सदर ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आणि नजीक असलेल्या कालवा फाट्यामुळे सतत पाणी साचते. त्यामुळे कडेठाण व पाटस येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात यावा. खुटबाव येथेही
उड्डाणपुलाची गरज आहे. यासंदर्भात राज्य शासनाने केंद्र शासनाकडे लवकरात लवकर प्रस्ताव सादर करून दौंडमधील जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी कुल यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असे कुल यांनी सांगितले.