

परिंचे : काळदरी खोऱ्यात रानडुकरांसह मोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यांनी येथील हातातोंडाशी आलेल्या भातपिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या खोऱ्यातील बांदलवाडी, बहिरवाडी, काळदरी, दवणेवाडी, धनकवडी, मांढर तसेच घेरा पुरंदर, देवडी, केतकावळे व चिवेवाडी, पानवडी या गावांच्या परिसरात रानडुकरे आणि मोरांनी धुमाकूळ घातला आहे. रानडुकरांचे कळप व मोरांच्या थव्यांनी येथील भुईमूग व भातपिकांचे अतोनात नुकसान केले आहे. या वन्यप्राण्यांमुळे येथील सुमारे 500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झाले आहे.(Latest Pune News)
या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वन विभाग, महसूल व कृषी विभागाला लेखी पत्राद्वारे आपली कैफियत मांडली आहे. ताबडतोब प्रशासनाने नुकसानग््रास्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे करावे तसेच नुकसानग््रास्तांना भरपाई द्यावी, असे अनेक शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले. पंचनामे करण्यास उशीर केल्यास नुकसानग््रास्त भागातील भात व 20 ट्रक काडा गोळा करून पुरंदर तहसील कार्यालयासमोर टाकण्याचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे.
वन्यप्राण्यांनी कष्टावर पाणी फिरविले
काढणीला आलेल्या भातपिकाला परतीच्या आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यातून सावरलेले पीकही रानडुकरांनी उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून लवकर भरीव मदत करावी, असे चिवेवाडी येथील ईश्वर दरेकर, बहिरवाडीचे प्रवीण भगत यांनी सांगितले.
नुकसानग््रास्त काळदरी आणि पानवडी परिसरातील शेतकऱ्यांनी लेखी अथवा ऑनलाइन अर्ज भरावा. त्यांच्या पिकांचे पंचनामे केले जातील तसेच काही अडचण असल्यास त्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा. नुकसानग््रास्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही केली जाईल.
सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी
वेल्हे : सिंहगड, पश्चिम हवेली परिसरात रानडुकरांच्या कळपांनी भातपिकांसह ऊस आणि खरीप पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिंहगड पायथ्याच्या खानापूर, सांबरेवाडी, मोरदरी, दुरुपदरा, मणेरवाडी, थोपटेवाडी, घेरा सिंहगड, खामगाव मावळ, मोगरवाडी तसेच आंबी, मालखेड, सोनापूर या भागांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून आठ ते दहा रानडुकरांचे कळप पिकांची नासाडी करीत आहेत. खानापूर येथील शेतकरी श्रीकांत ज्ञानोबा जावळकर यांचे जवळपास एक एकर क्षेत्रातील भातपीक मंगळवारी (दि. 4) रानडुकरांच्या कळपाने जमीनदोस्त केले. सोनापूर, मालखेड येथे भातासह उसाचे पीकही जमीनदोस्त झाले आहे. सिंहगड-पानशेतच्या जंगलातील रानडुकरांचे कळप रातोरात शेतात शिरून पिकांची नासाडी करीत आहेत.
सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील यांनी सांगितले की, रानडुक्कर, हरीण, मोर, लांडोर यांसारख्या वन्यजीवांनी पिकांचे नुकसान केल्यास शासन आदेशानुसार संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल. मात्र, शेतकऱ्यांकडून वेळेवर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे अल्प प्रमाणातच नुकसानभरपाई मिळत आहे.