कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : धोकादायक पध्दतीने ऊस वाहतूक करणार्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग (बारामती) कारवाई कधी करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रिफ्लेक्टर नसलेल्या ऊक् वाहतुकीच्या वाहनांमुळे सातत्याने अपघात घडत असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर अशी कारवाई करणे आता गरजेचे झाले आहे.
सध्या ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. दिवस-रात्र ऊसवाहतुकीचे ट्रक, ट्रॅक्टरट्रॉली अशी वाहने दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर, मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरून धावत आहेत. ऊसवाहतुकीच्या वाहनांची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ट्रॅक्टरट्रॉलीतून धोकादायक पध्दतीने ऊसवाहतुक केली जात आहे.
कारखान्यात ऊस खाली करून रिकाम्या निघालेल्या ट्रॅक्टरट्रॉलीचा वेग प्रचंड असतो. वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरला जातो. परिणामी, ट्रॅक्टरट्रॉलीचा खोळंबा होतो. चालू स्थिती ट्रॉलीतून उसाच्या मोळ्या, ऊस खाली रस्त्यावर पडतो. एक ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या सर्रास जोडलेल्या असतात. काही ट्रॉल्यांची भयानक अवस्था असते. मागील दोन्ही ट्रॉल्यांची धोकादायक स्थिती असते. रस्त्यावर ट्रॅक्टरट्रॉल्या उभ्या केल्या जातात.
बर्याच ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. ऊसवाहतूक करणाऱ्यांना रिफ्लेकटरचे काही देणेघेणे राहिले नाही. रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. काही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अतिशय मळलेले कापडी रिफ्लेक्टर लावलेले असतात. वास्तविक, त्याचा काही उपयोग होत नाही. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.