

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी मजबुतीने सामोरे जाणार असून काँग्रेस, शिवसेना यांच्या नेत्याबरोबर लवकरच बैठक घेऊन जागा वाटपाचा फॉर्मुला ठरवलं जाईल, तसेच महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनातील सक्षम सरकार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायणगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Maharashtra Assembly Election)
शरद पवार नारायणगाव येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी शनिवारी ( दि. 20) सकाळी साडेआठ वाजता आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापू शेवाळे, खासदार अमोल कोल्हे, तालुका अध्यक्ष तुषार थोरात आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, आमच्या आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून असणारे इच्छुकांबाबत त्या-त्या पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. दोन-तीन आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून जागा वाटपाबाबतचा एकत्रितपणे निर्णय घेऊ. कोणी कोणता मतदारसंघ लढवायचा? व कोणत्या घटक पक्षाला किती जागा? याबाबतचा निर्णय त्यावेळी घेऊ. महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राला चांगलं सरकार देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
जनतेच्या मनातील व चांगलं आणि स्थिर सरकार देण्यासाठी सध्या वेगवेगळे जिल्ह्यामध्ये आम्ही फिरत आहोत. जनतेचे मत आजमावून घेत आहोत. तसेच आमच्या महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता राहील याबाबतची देखील काळजी घेत आहोत. जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांची मी संवाद साधला असून त्यांचंही मत जाणून घेतले असल्याचे पवार यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाकडून जास्त जागांची मागणी होत असली तरी कोणाची ताकद कुठे किती हे पाहून याबाबत निर्णय होईल. लोकसभेला आम्ही दहा जागा लढवल्या आणि आठ जागांवर विजय मिळवला. आज राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरला आहे. तथापि आम्ही असा पहिला दुसरा तिसरा असे काही नंबर मानत नाही.
विशाळगडावर परिसरामध्ये अतिक्रमण कारवाई करताना काही मुस्लिम मंडळींवर अन्याय झाल्याची माहिती मिळत आहे,गडाच्या खाली जे मुस्लिम लोक राहतात त्यांच्यावर कारण नसताना हल्ले करण्यात आले. ज्या लोकांना मारहाण झाली व अन्याय झाला हे करण्यात कोल्हापूरचे लोक नव्हते. बाहेरच्या लोकांनी हा उद्योग केल्याची माहिती मिळत असल्याचे पवार यांनी सांगितले. त्या परिसरामध्ये शांतता प्रस्थापित होईल असे मी अपेक्षा व्यक्त करतो, असे पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले ते शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगला विजय मिळाल्यामुळे साहजिकच इच्छुकांची संख्या अधिक आहे. आमच्यातील महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाला वाटतंय जागा आम्हाला मिळावी. याबाबत आम्ही सगळे एकत्र बसून योग्य निर्णय घेऊ. काही अडचण निर्माण होईल असे मला वाटत नाही.
पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची काँग्रेसची चांगली असल्याने अधिकच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल असे पवार यांनी सांगितले. आमदार अतुल बेनके आपल्याला भेटले असे पत्रकारांना विचारले असता पवार म्हणाले की, अतुल बेनके मला भेटल्याचे नवीन नाही. तथापि याविषयी अधिक बोलण्याचे टाळले.