

भीमाशंकर: आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात सध्या तीव पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. धरणकाठच्या गावांमध्येही ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, घोटभर पाण्यासाठी महिलांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. अनेक जलजीवन नळ योजना अपूर्ण किंवा नादुरुस्त असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
आहुपे, पाटण, आसाणे आणि भीमाशंकर खोऱ्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या तीव झळांमुळे पाणीटंचाई वाढली आहे. हा भाग अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जात असला, तरी उन्हाळा सुरू होताच हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
अनेक ठिकाणी गाळमिश्रित आणि अशुद्ध पाण्यावर नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. भीमाशंकर परिसरात दोन प्रादेशिक पाणी योजना असल्या, तरी त्या वारंवार बंद पडणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे आणि दोन-तीन दिवसांनी पाणी येणे, अशा समस्यांमुळे योजनेचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी तळी, विहिरी, शिवकालीन टाक्या आणि बंधारे उभारण्यात आले असले, तरी नियोजनाच्या अभावामुळे त्या निष्प्रभ ठरत असल्याचे चित्र आहे.
निकृष्ट दर्जाची कामे, जागा निवडीत झालेल्या त्रुटी, ठेकेदारांची उदासीनता आणि प्रशासकीय दिरंगाई, यामुळे पाणी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचत नसल्याची भावना ग््राामस्थांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे पावसाळी प्रदेशातही उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाई तीव होत आहे. पिंपरी, साकेरी, कुशिरे, पाटण, पंचाळे, आडिवरे, वचपे, कोलतावडे, बोरघर आणि फुलवडे ही धरणकाठची गावे असून, येथेही नागरिकांना पाण्यासाठी डोंगर-टेकड्या चढ-उतार करीत भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान, तालुक्याचे आमदार तथा माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदिवासी भागातील पाणी योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. मात्र, ठेकेदार आणि संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे अनेक योजना प्रभावीपणे कार्यान्वित झाल्या नसल्याची टीका केली जात आहे.