पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागाला पावसाने झोडपले आहे. दरम्यान काही जिह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पुढील तीन ते चार तासांत राज्यातील बहुतांश जिह्यांत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के.एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
डॉ. होसाळीकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, येत्या तीन ते चार तासांत मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सांगली, हिंगोली, परभणी, लातूर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
गेल्या तीन तासात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सखल भागात पूर स्थिती निर्माण होऊ शकते, या स्थितीत वाहतुक वेग मंदावतो त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होऊ शकते. दरम्यान या भागात पुढील ३ ते ४ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.