पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते राजीव गांधी पूल यादरम्यान रस्त्यावरून चालत असाल, तर सावध चला! कारण, रस्त्यावरच उघड्या असलेल्या डीपीच्या तारांमुळे कधी विजेचा झटका बसेल, याचा नेम नाही. विद्यापीठ चौकात तर ब्रिजचे काम चालू असल्यामुळे पदपथ अस्तित्वात आहे की नाही, याचा शोध घ्यावा लागत असल्याचे चित्र दैनिक मपुढारीफच्या पाहणीत आढळून आले. विद्यापीठ चौकात फुटपाथवरच विक्रेत्यांनी विविध फळांच्या रसाचे स्टॉल लावल्यामुळे पादचार्यांना येण्या-जाण्यास देखील रस्ता शिल्लक नाही.
विद्यापीठ चौकातून पुढे जाणार्या पादचार्यांना अत्यंत तोकड्या पदपथावरून चालावे लागत असल्याचे दिसून आले. विद्यापीठाकडून औंधकडे जाणार्या रस्त्यावर केंद्रीय विद्यालयाच्या जवळपास पदपथावर अतिक्रमण झाल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीमती कस्तुरबा गांधी वसाहतीलगतच्या परिसरात राहत असलेल्या काही नागरिकांनी पदपथ अक्षरश: ताब्यात घेतल्याचे दिसून येते. विद्यापीठ ते राजीव गांधी पूल यादरम्यान पांढरे पट्टे (झेब—ा क्रॉसिंग) दिसून आले नाहीत. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांची रस्ता ओलांडताना मोठी तारांबळ उडत असल्याचे दिसते. अतिक्रमणे बाजूला करून पदपथ पादचार्यांना चालण्यासाठी रिकामा कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांंना पडला आहे.
विद्यापीठ ते राजीव गांधी पूल यादरम्यान पदपथावरच विजेची मोठी डीपी लावण्यात आली आहे. त्याच्याशेजारीच मीटर असून, त्याचे झाकण सताड उघडे असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रस्त्यावरून चालणारे नागरिक तसेच लहान मुलांना विजेपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पंक्चरची दुकाने, फळांचे स्टॉल, शीतपेयाचे स्टॉल आदी पदपथावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठ ते राजीव गांधी पूल यादरम्यान चालण्यासाठी पदपथ अस्तित्वात आहे. परंतु, त्याची स्वच्छता करण्यात येत नाही. पदपथावरच लावण्यात आलेल्या छोट्या झाडांबरोबर मोठ्या प्रमाणात गवतासह अन्य वनस्पती उगवल्या आहेत. त्याचा चालणार्या नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे आवश्यक ती झाडे ठेवून पदपथावरील अन्य कचरा काढून त्याची योग्य ती स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे दिसून आले.
हेही वाचा