पिंपरी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा उद्या (दि. 7) महाराष्ट्रात दाखल होत आहे. या यात्रेच्या समर्थनार्थ चिंचवडमध्ये पदयात्रा काढण्यात आली. चिंचवड येथील क्रांतिवीर चाफेकर बंधु यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी महापौर कवीचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, महिला शहराध्यक्ष सायली नढे यांसह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
यात्रेची शहरात जनजागृती
राहुल गांधी यांची यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी आहे. 7 नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. तीन हजार पाचशे किलोमीटर अंतर चालत 150 दिवसांत 13 राज्यांमधल्या जनतेला ते आपलंस करू पाहत आहेत. देशातील विषमतेचे वातावरण, धर्म आणि जातीमधील तेढ विरोधात ही यात्रा आहे. या यात्रेची शहरात जनजागृती व्हावी म्हणून ही पदयात्रा काढण्यात आल्याचे शहराध्यक्ष कदम यांनी सांगितले.