पीएमपी प्रवाशांचे बस थांब्यांवरच वेटिंग; बस संख्या वाढवण्याची गरज

पीएमपी प्रवाशांचे बस थांब्यांवरच वेटिंग; बस संख्या वाढवण्याची गरज
Published on
Updated on
पुणे :  पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूर्वी पीएमपीची रोजची प्रवासी संख्या 10 लाखांपर्यंत होती. आता ती 12 ते 13 लाखांपर्यंत गेली आहे. त्या तुलनेने बसची संख्या मात्र वाढलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना उन्हात बसची वाट पाहात उभे राहावे लागते. शनिवारी (दि. 6) करण्यात आलेल्या पाहणीत असे चित्र पाहायला मिळाले. उन्हाचा पारा 40 अंशांच्या घरात गेला आहे. एकीकडे उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना पुरेसे बस थांबे नाहीत. वेळेत बस मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याची शनिवारी दैनिक 'पुढारी'च्या वतीने शहरात प्रत्यक्ष फिरून पाहणी करण्यात आली.
या वेळी पीएमपीच्या प्रवाशांना बससाठी वाट पाहावी लागत असल्याचे दिसले. त्यात काही ठिकाणी पीएमपीचे थांबे अपुरे होते. त्यामुळे प्रवाशांना थांबे असूनही उन्हातच थांबावे लागत असल्याचे पाहायला मिळाले.

पीएमपीच्या ताफ्यात चार हजारांपेक्षा जास्त बसेसची गरज

पुणे शहराची लोकसंख्या 50 लाखांपेक्षा अधिक झाली आहे.  महापालिकेच्या सर्वंकष आराखड्यानुसार पुणेकरांचा बस प्रवास सुकर करण्यासाठी मार्गावर दररोज साडेतीन हजारांपेक्षा अधिक बस धावणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत फक्त 1700 च बसगाड्या दररोज मार्गांवर प्रवासी सेवा पुरवतात. यावरून पुणेकरांसाठी बसगाड्यांची संख्या खूपच कमी  असून ती वाढवण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच सध्या पीएमपीच्या ताफ्यात जवळपास 2081 बसेस आहेत. जर साडेतीन हजार बसेस रस्त्यावर धावणे अपेक्षित असेल तर ताफ्यात साधारणत: चार हजारांपेक्षा जास्त बसेस असणे गरजेचे आहे.

पीएमपीने मेट्रोप्रमाणे सेवा द्यावी

पीएमपी प्रशासनाने गाड्यांच्या मार्गांचे नियोजन करायला हवे. ठरावीक 4 ते 5 मिनिटांनी शहरात सर्वत्र बस उपलब्ध व्हायला हवी. पीएमपीची ओला-उबेरप्रमाणे अ‍ॅपद्वारे सेवा मिळाल्यास खूप फायद्याचे ठरेल. थांब्यावर बस किती वाजता येईल, येणारी बस किती वेळात येईल आदी माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना उन्हात, पावसात जास्त वेळ थांबावे लागणार नाही, असे पीएमपीचे प्रवासी सागर शिंदे यांनी सांगितले.
शनिवारी, रविवारी प्रवासी संख्या कमी असल्याने इतर दिवसांपेक्षा कमी बस गाड्या सोडल्या जातात. या वेळी साधारणत: 1700 बस मार्गांवर असतात. नुकत्याच 262 बस स्क्रॅप केल्या आहेत. मात्र, त्याला पर्याय म्हणून खात्याकडील बंद असलेल्या सुमारे 100 पेक्षा अधिक बस दुरुस्त करून मार्गावर उतरवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना बसची कमतरता भासणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मेट्रो फीडरसाठी 19 बस देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचा इतर वाहतुकीवर परिणाम होत नाही. तसेच, प्रवाशांकरिता बस थांबे बसवण्यात येत आहेत.
– सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल.

असे आहे पीएमपीचे दिवसाचे नियोजन

  • रोजच्या  मार्गावरील बस – सरासरी 1670
  • रोजच्या ब्रेकडाऊन बस – सरासरी 47 ते 50
  • रोजची प्रवासी संख्या – सरासरी 11 ते 12 लाखांपेक्षा अधिक
  • रोजच्या फेर्‍या – सरासरी 18 हजारांपेक्षा अधिक
  • बस गाड्यांची रोजची धाव (किमीमध्ये) – सरासरी 3 लाख 37 हजार 469
  • रोजची तिकीट विक्री – सरासरी 1 कोटी 41 लाख 27 हजार 974
  • रोजचे उत्पन्न – सरासरी 1 कोटी 53 लाख 90 हजार 991 रुपये

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news