मंचर : पुढारी वृत्तसेवा : जाधववाडी (ता. आंबेगाव) येथे सरकारी नोंद असलेल्या लौकी-रांजणी रस्त्यालगत जमिनी असणार्या काही व्यक्तींनी अतिक्रमण करून रस्ता बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तहसीलदारांनी न्याय द्यावा अशी मागणी सरपंच अंकुश जाधव यांनी केली आहे.
जाधववाडी येथे मिंडे मळामधून (जाधववाडी, कळंब व लौकी) पाणंद रस्ता आहे. सदरचा रस्ता गावच्या नकाशामध्ये नमूद आहे. या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. सदर रस्ता शेतमाल, गवळी, ग्रामस्थांना शेतीपयोगी मालाच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू असते. परंतु रस्त्यालगत असलेल्या काही शेतकर्यांनी शेतीचे अतिक्रमण करून हा रस्ता बंद केला आहे.
पर्यायी मार्ग म्हणून पाटबंधार्याच्या चारीने रस्ता काढून दिला होता. मात्र आता ज्या व्यक्तीच्या शेतामधून पर्यायी रस्ता होता त्यानेही रस्ता वाहतुकीस बंद केल्याने पूर्वीचा सरकारी रस्ता प्रशासनाने हस्तक्षेप करून पुन्हा सुरू करून द्यावा, अशी मागणी जाधववाडी ग्रामपंचायतीने केली आहे. याबाबतचे पत्र सरपंच, ग्रामस्थ यांनी तहसीलदार, पोलिस प्रशासन यांना दिले आहे.