पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'नाटकाला भविष्य उरलेले नाही, ही ओरड मी गेल्या पन्नास वर्षांपासून ऐकत आहे. पण कुठं काय झालं. आजही नाटक सुरू आहे. कुणी कितीही काहीही म्हणू देत. पण, लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणून नाटक कायमच जिवंत राहाणार आहे,' असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते नसिरूद्दीन शाह यांनी शनिवारी (दि.3) व्यक्त केला.
पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये शाह यांचा संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ओटीटी हे मनोरंजनाचे भवितव्य आहे. आगामी 25 ते 30 वर्षांमध्ये चित्रपटाचे अस्तित्व संपेल आणि चित्रपट पाहाणे हा सार्वजनिक अनुभव राहणार नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कलाकाराला एखादे पात्र उलगडून सांगणे हाच मूर्खपणा आहे. कलाकारांनी थिअरीमध्ये अडकता कामा नये. त्या पात्राला काय सांगायचे आहे ते समजून अभिनय केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
शाह म्हणाले, 'सध्याच्या तरुण कलाकारांच्या कामावर मी खूश आहे. आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली शिकायचे आहे असे जेव्हा ते आग्रह धरतात तेव्हा त्यांना मी एकच सल्ला देतो की, कशाला कुणी हवेय? स्वत: काहीतरी निर्मित करा आणि लोकांना दाखवा. भलेही पाहाण्यासाठी तुमचे दोनच मित्र का असेना. स्वत: शिका आणि करा, कुणावर अवलंबून राहू नका.'
कोणत्याही कलाकाराला आयुष्यात यश-अपयशाचा सामना करावा लागतोच. पण, त्याचा माझ्यावर कधीच परिणाम झाला नाही. मी वस्तू नाहीये. काही कलाकार विकले जातात. त्यात त्यांचा दोष नाही. चांगले जीवन जगावेसे वाटणे यात गैर काहीच नाही. मी देखील उपाशी राहाणे, हाताला काम नसणे असे अनुभव घेतले आहेत. पण, मला जगातला श्रीमंत माणूस व्हायचंच नव्हते.
मी स्पर्धेत धावणारा घोडा नव्हतो. ज्यावेळी 'त्रिदेव' अनपेक्षितपणे हिट झाला, तेव्हा देखील मी माझे मानधन वाढवले नव्हते. त्यामुळे यश-अपयशाचा मला फारसा सेट बॅक बसला नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. मला फिल्म पपोड्यूस बाय या बिझनेसविषयी प्रचंड राग आहे. चित्रपट निर्मिती म्हणजे एक टीमवर्क असते. ते कुणा एक-दोघा व्यक्तींचे श्रेय नसते, असे परखड मत शाह यांनी व्यक्त केले.