

शंकर कवडे
पुणे : जुन्या कांद्याचा हंगाम संपला असून, वखारीही रिकाम्या झाल्या आहेत. तर, नव्या कांद्याला पावसाचा तडाखा बसल्याने त्याचा परिणाम प्रतवारीवर झाला आहे. एरवीच्या तुलनेत बाजारात फक्त 35 ते 40 टक्केच कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे शहरासह विविध बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बटाट्याची आवक एरवीच्या तुलनेत टिकून आहे. मात्र, देशभरातील बाजारपेठांमध्ये बटाट्याला मागणी वाढल्याने त्याच्यासह कांद्याच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.(Latest Pune News)
नवीन आल्याची होणारी आवक आता कमी झाली आहे. परराज्यातील गाजराचा, तर स्थानिक भागातील मटारचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात आवक घटली आहे. तर, तामिळनाडू येथून येणाऱ्या तोतापुरी कैरीची आवक रोडावल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आले, गाजर, मटार आणि तोतापुरी कैरीच्या भावातही दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. मागणीइतकाच पुरवठा होत असल्याने अन्य सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 26) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, इंदूर येथून गाजर 2 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 5 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 200 ते 250 क्रेट, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो आणि पावटा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 8 ते 10 टेम्पो तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 ते 45 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 450 गोणी, भेंडी 5 टेम्पो, गवार 3 टेम्पो, टोमॅटो 8 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 टेम्पो, गाजर 6 टेम्पो, कोबी 5 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, भुईमूग शेंग 50 ते 60 गोणी, मटार 400 ते 450 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 60 टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्या स्थिर
मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची मोठी आवक होत आहे. दिवाळीला गावी गेलेले लोक अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे खानावळी सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे मालाला उठाव कमी आहे. करडई आणि चाकवत वगळता सर्व पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. आवकेपेक्षा मागणी जास्त असल्याने करडई आणि चाकवतच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे अनुक्रमे 2 आणि 3 रुपयांनी वाढ झाली आहे. सोमवार (दि. 27) नंतर मागणी वाढेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 26) कोथिंबिरीची सुमारे 1 लाख 50 हजार जुडी, तर मेथीची 50 हजार जुडींची आवक झाल्याचे सांगण्यात आले.