

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महसूल विभागांतर्गत असलेले सातबारा उतारा, आठ-अ, वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा कमी करणे किंवा चढविणे, ई-करार आणि धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांचे नाव बदलणे यासह विविध प्रकारच्या फेरफार विषयक सेवा आता महा ई सेवा केंद्र, सेतू तसेच आपले सरकार सेवा केंद्रातून अधिकृतरीत्या घेता येणार आहेत. त्याकरिता सेवा शुल्कही राज्य शासनाने निश्चित केले आहे. यामुळे आता तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजविणे बंद होणार आहे.
भूमि अभिलेख विभागाने महाभूमी संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, आठ-अ उतारे उपलब्ध करून दिले आहेत.
याबाबत माहिती देताना अपर जमाबंदी आयुक्त सरिता नरके म्हणाल्या, 'राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फेरफारसह सर्व सेवा महा ई सेवा केंद्र, सेतू किंवा आपले सरकार सेवा केंद्रातून घेता येणार आहेत. त्यासाठी सेवांचे दर निश्चित केले आहेत. सातबारा उतारा, आठ-अ केंद्रचालकांकडून घेताना 25 रुपये शुल्क असेल.
ई-हक्क सेवा म्हणजे जे फेरफार नोंदणीकृत दस्ताद्वारे होत नाहीत, तर केवळ अर्जाद्वारे होतात. अशा फेरफारसाठी अर्ज करण्यास ई-हक्क प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी एका अर्जासाठी 25 रुपये शुल्क घेऊन या केंद्रांतून ही सेवा मिळणार आहे. या सेवा घेताना काही कागद घ्यायचे किंवा अपलोड करायचे असल्यास त्यासाठी 25 रुपयांपेक्षा अधिकचे शुल्क असेल.'
वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा कमी करणे किंवा चढविणे, कलम 155 खालील दुरुस्त्या याकरिता तलाठ्यांकडे अर्ज करावे लागतात. हे अर्ज तलाठी कार्यालयात न करता नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
– सरिता नरके, अपर जमाबंदी आयुक्त.
हेही वाचा