पुणे; पुढारी वृत्तसेवा : माता मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणार्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणीकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुणे येथे आयोजित बैठकीत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी अभिनंदन केले.
यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, डॉ.रामचंद्र हंकारे, डॉ.अशोक नंदापूरकर, डॉ.अनिरुद्ध देशपांडे व इतर अधिकारी उपस्थित होते. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मातृत्व आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माता आरोग्याच्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल राज्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.
नोव्हेंबर 2022 मध्ये रजिस्ट्रार जनरल इंडियाने प्रकाशित केलेल्या नमुना नोंदणी प्रणालीच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये मातामृत्यू प्रमाण 2017-19 मधील 38 प्रतिलक्षवरून सन 2018-20 मध्ये 33 प्रतिलक्ष झाले आहे. देशामध्ये मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर महाराष्ट्र दुसर्या स्थानावर आहे, तर केरळ पहिल्या स्थानावर आहे. केंद्र सरकारने प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणार्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी डिसेंबर 2017 मध्ये लक्ष्य कार्यक्रमाला सुरुवात केली.
यामध्ये महाराष्ट्राला द्वितीय पुरस्कार मिळाला. दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार डॉ. अशोक नांदापूरकर आणि डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी स्वीकारले. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशा व परिचारिका गटात राज्याला द्वितीय पुरस्कार गोंदिया जिल्ह्यातील डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका गीता चोपराम भेंडारकर व परिचारिका पंचफुला राणे यांना देण्यात आले आहेत.