खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : उन्हाची तीव्रता वाढल्याने धायरी, किरकटवाडी, नर्हेसह समाविष्ट गावांत पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. असे असताना या गावांत मशिनने (आरओ) विक्री होत असलेल्या शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट केली जात आहे. सार्वजनिक नळाच्या पाण्यावर मशिन बसवून दूषित पाण्याची शुद्ध पाणी म्हणून विक्री करणार्या पाणीमाफियांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे.
धायरी येथील बेनकरमळा, रायकरमळा, किरकटवाडी, नर्हे आदी ठिकाणी किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स तसेच चौकाचौकांत पाण्याचे मशिन बसवून पाणीमाफियांनी पाणी विक्रीची दुकाने थाटली आहेत. या पाणीमाफियांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर आणि नागरिकांनी केली आहे.
पाणीटंचाईचा गैरफायदा घेत मोफत मिळणार्या पाण्याचा या भागात काळाबाजार सुरू आहे. पाणी विक्रेत्यांनी खासगी कंपन्यांच्या मशिन बसवून शुद्ध पाण्याच्या नावाखाली विक्रीची दुकाने थाटली आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून अशा मशिनच्या पाण्याचा परिसरात सुळसुळाट झाला आहे. एका मशिनची किंमत एक ते चार लाख रुपये आहे. पाणी विक्री करणार्या मशिनवर प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. पाण्याची विक्री करणार्या माफियांवर व्यावसायिक पाणी कर लावावा, बेकायदा पाणीपुरवठा बंद करावा, मशिन व पाण्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मशिनमधून विक्री होणार्या पाण्याची तपासणी केली जात नाही. एक रुपया लिटरप्रमाणे पाण्याची विक्री केली जात आहे. यावर प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. दूषित पाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या नळालाच बेकायदा कनेक्शन जोडले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.
समाविष्ट गावांत पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मशिनमधून विक्री होत असलेल्या पाण्याची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. अशुद्ध तसेच सार्वजनिक पाण्याची विक्री केली जात असेल, तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
– संदीप खलाटे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
हेही वाचा