

पुणे : जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘इको टुरिझम’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सुमारे 15 ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तेथे विविध मूलभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 60 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. (Latest Pune News)
पुणे जिल्ह्यात तीनशेहून अधिक पर्यटनस्थळे आहेत. प्रामुख्याने पावसाळ्यात धबधबे, घाट आणि साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मावळ, मुळशी, भोर, राजगड, खेड आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये पावसाळी पर्यटनाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. ‘इको टुरिझम’साठी ठिकाणांची निवड करताना अभयारण्ये, धबधबे, किल्ले, लेणी यांचा विशेष विचार करण्यात आला आहे. या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगारसुद्धा उपलब्ध होणार असल्याचे डुडी यांनी सांगितले.
मुळशीतील ताम्हिणी घाट आणि अंधारबन या ठिकाणी पावसाळ्यात भेट देणार्यांची संख्या लाखोंमध्ये असते. मात्र, पर्यटकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. त्यामुळे येथे आवश्यक मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक असलेले मयूरेश्वर मंदिर, राजगड किल्ला, जंगल सफारीसाठी प्रसिद्ध कडबनवाडी आणि भाजे लेणी या ठिकाणांसह सुमारे 15 ठिकाणी पहिल्या टप्प्यात विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तिकीट काउंटर, स्वच्छतागृहे, बसण्याची व्यवस्था, चेंजिंग रूम आदी सुविधा उभारल्या जाणार आहेत. लवकरच या कामांना मान्यता देऊन डिसेंबरपूर्वी प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाचा आहे.
राजगड, रायरेश्वर, तिकोना, भाजे, कडबनवाडी, नाणेघाट, ताम्हिणी, मिल्कीबार धबधबा, भामचंद्र डोंगर, राजपूर, मयूरेश्वर, पवना, कामशेत, अंबोली, कुंडेश्वर