![मांजरी : टोमॅटो शेळ्या-मेंढ्यांच्या हवाली !](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F05%2FTomato-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मांजरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : लाखो रुपयांचा खर्च करूनही टोमॅटोला चांगला बाजारभावही मिळत नाही. त्यामुळे मांजरी खुर्द येथील एक शेतकर्याने आपल्या एक एकर टोमॅटोच्या शेतात शेळ्या, मेंढ्या सोडून दिल्या. मातीमोल बाजारभावामुळे या पिकाचा उत्पादन खर्चही वसूल न झाल्याचे या शेतकर्याने सांगितले.
मांजरी खुर्द येथील शेतकरी अक्षय आव्हाळे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोची लागवड केली होती. त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. यामुळे या पिकाची मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली आणि चांगले उत्पादनही आले. मात्र, बाजारात टोमॅटोच्या एका कॅरेटला फक्त 80 ते 100 रुपये बाजारभाव मिळत असल्याने या पिकाची तोडणीही परवडत नव्हती. त्यामुळे उभ्या पिकात शेळ्या, मेंढ्या सोडल्याचे आव्हाळे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मी गेली दोन वर्षांपासून शेती करीत आहे. यंदा टोमॅटोला चांगला बाजार मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पीक ऐनभरात आल्यावर बाजारात टोमॅटोला मातीमोल भाव मिळू लागला. त्यातून लागवड, मशागत, मजुरी आदींचा खर्च सोडा, वाहतूक खर्चही वसूल होऊ शकला नाही. त्यामुळे पैसे, वेळ, श्रमाचे मोठे नुकसान झाले आहे.