राजेंद्र कवडे-देशमुख :
बावडा : दुधाला दर चांगला मिळत असल्याने सध्या शेतकर्यांना दूध व्यवसाय चांगला आर्थिक आधार देत आहे. त्यामुळे गोठ्यातील दुभत्या जनावरांची संख्या वाढविण्यासाठी शेतकर्यांची मोठी लगबग दिसून येत आहे. पंजाब, हरियाना, कर्नाटक आदी राज्यांत जाऊन दुभत्या गाईंची खरेदी मोठ्या संख्येने सुरू आहे. दूध धंदा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याने शेतकर्यांबरोबर युवक, महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर या व्यवसायात उतरला आहे. शिक्षण पूर्ण झाले आहे, परंतु नोकरी मिळत नाही. त्यामुळे बहुतांशी बेरोजगार युवकांनी दूध धंद्याकडे लक्ष दिले आहे. सध्या गाईच्या दुधाला प्रतिलिटर 37 ते 40 रुपयांपर्यंतचा दर मिळत असल्याने दूध उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
एका गाईच्या खरेदीचा दर हा रुपये एक लाखाच्या पुढे गेला आहे. परराज्यातूनच गाई खरेदी करण्याकडे शेतकर्यांचा मोठा कल असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे आधुनिक पद्धतीने गोठा बांधण्यासाठीही शेतकरी लाखो रुपयांची गुंतवणूक करीत आहेत. तर, काही शेतकरी मुक्त गोठा पद्धतीने गायींचे संगोपन करीत आहेत. तसेच एक-दोन एकर क्षेत्रावर चारा पिके घेत नियोजन केले आहे. दूध धंद्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे प्रगती शेतकरी शरद जगदाळे-पाटील (टणु), प्रतीक घोगरे (गणेशवाडी), प्रदीप बोडके (पिंपरी बु.), महेश शिर्के (वडापुरी) यांनी सांगितले.
दूध व्यवसायाने ग्रामीणमधील अर्थकारण बदलले
गेली चार-पाच दशकांपासून दूध धंद्याने ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलले आहे. ग्रामीण भागाच्या प्रगतीमध्ये दूध धंद्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना दूध धंदा मोडकळीच आला होता. मात्र, आता दूध धंद्याने मोठे उड्डाण घेतले असून, पुन्हा जोमाने वाढीस लागला आहे. दूध व्यवसाय वाढीसाठी अकलूज, सांगोला आदी स्थानिक बाजारांबरोबरच पंजाब, हरियाना, कर्नाटकमध्ये जाऊन गाई खरेदी करून आणल्या जात आहेत.