पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सुमारे सहा लाख शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा लाभ मिळतो. त्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 823 दुकानांतून स्वस्त धान्य वितरित केले जाते. जिल्हा पुरवठा विभागात एकूण 84 पदे मंजूर असून, त्यापैकी 43 पदे भरलेली आहेत. मात्र, त्यातील केवळ 13 पदे ही पुरवठा विभागाची आहेत, तर उर्वरित 32 पदे महसूल विभागातून प्रतिनियुक्तीवर घेण्यात आली. अजूनही 39 पदे रिक्त असल्याने वेळेत धान्यपुरवठा करताना पुरवठा विभागाची दमछाक होत आहे.
जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याला आवश्यक धान्याची मागणी केली जाते. त्यानुसार धान्याचा पुरवठा होत असतो. हे धान्य गोदामातून तालुका गोदामात पाठविले जाते. त्या ठिकाणावरून स्वस्त धान्य दुकानदार धान्य उचलत असतात. त्यानंतर जिल्ह्यातील 1 हजार 823 दुकानांतून लाभार्थी धान्य घेतात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून धान्याची उचल वेळेवर होत नसल्याने लाभार्थ्यांना धान्य वेळेवर मिळत नाही. जिल्हा पुरवठा विभागात एकूण 84 पदे मंजूर आहेत.
त्यातील 3 पदे पुरवठा निरीक्षक (तालुकास्तर), गोदाम व्यवस्थापक श्रेणी-2 (तालुकास्तर) लिपिक 3, पुरवठा लिपिक (तालुकास्तर) 17, गोदामपाल 9 आणि वाहनचालकाचे एक, अशी एकूण 39 पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे भरलेल्या 45 पदांपैकी 32 पदे महसूल विभागातून प्रतिनियुक्तीवर भरण्यात आली आहेत, तर
पुरवठा विभागाची केवळ 13 पदे भरलेली आहेत.
असे आहेत शिधापत्रिकाधारक
अंत्योदय – 48 हजार 166
केसरी – 5 लाख 29 हजार 28
शुभ्र – 50 हजार 515
जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून मंजूर पदांची बिंदुनामावली शासनाला सादर करण्यात आली. त्यावर शासन निर्णय कधी, हे सांगता येत नाही. त्यामुळे उपस्थित मनुष्यबळाची मदत घेऊनच काम केले जात आहे. नुकतेच राज्याचे पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांनी आढावा घेतला. त्या वेळी रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे, असे सांगण्यात आले.