…तर गावकारभार्‍यांच्या रोषाला सामोरे जा!

…तर गावकारभार्‍यांच्या रोषाला सामोरे जा!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गावगाड्याचा कारभार चालवणार्‍या सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक या प्रमुख घटकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. शासनदरबारी वारंवार मागण्या करूनही गावखेड्यांना सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार झाला नाही, तर राज्य शासनाला गावकारभार्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा गावखेड्यांच्या अपेक्षा मोर्चाच्या सहविचार व पूर्वतयारीच्या राज्यस्तरीय बैठकीतून देण्यात आला.

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुढाकाराने पुण्यातील पाषाण रोड भागातील सीपीआर इन्स्टिट्युटच्या सभागृहात सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी या सर्व राज्यस्तरीय संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील ग्रामपंचायतींना आणि ग्रामविकासाचा गाडा चालवणार्‍या प्रमुख घटकांना एकत्र करून लढा उभारण्यासाठी ही विचारविनिमयाची बैठक होती.

या बैठकीत ग्रामपंचायत चालवणार्‍या सर्व घटकांच्या संघटनांची एकत्रित मोट बांधण्याचा व यापुढे सर्वांच्या प्रलंबित मागाण्यांसाठी समान कृती कार्यक्रम तयार करून एकत्रित लढा उभारण्याचे धोरण जाहीर करण्यात आले. सरपंच परिषदेचे जयंतराव पाटील, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव निकम, संगणक परिचालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, ग्राम रोजगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण, सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, गावखेड्यांना देण्यात येणारी सावत्र वागणूक थांबवावी, सरपंचांना जाहीर केलेले मानधन नियमित अदा करावे, अनियमिततेच्या नावाखाली ग्रामसेवकांना नाहक फौजदारी कचाट्यात अडकवण्याचे प्रकार थांबवावेत, संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा द्यावा, त्यांना खासगी कंपनीमार्फत नेमून दरसाल कोट्यवधी रुपये वाचवावेत, ग्राम रोजगार सेवकांना दुर्लक्षित करू नये, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना राहणीमान भत्ता लागू करावा, अशा आमच्या मागण्या आहेत. यावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा व आम्हाला न्याय द्यावा.

ग्रामपंचायत कारभारात भूमिका असणार्‍या सर्व प्रमुख घटकांना एकत्र करत शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष होत असल्याने येत्या पंधरवाड्यात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पुन्हा मागणी करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने तत्काळ धोरण न ठरवल्यास डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरातील ग्रामपंचायती काम बंद आंदोलन उभारतील, असा निर्धार सर्वानुमते करण्यात आला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या काळात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सर्वांचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढण्याचे ठरले आहे, असेही पाटील यांनी नमूद केले. प्रदीप माने यांनी प्रास्ताविक केले. नरवाडे यांनी आभार मानले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news