पुणे: कल्याणीनगर पोर्श अपघात प्रकरणातील दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलल्याप्रकरणी आरोपी आशिष मित्तल व अरुणकुमार सिंग यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा आदेश दिला.
या सर्व दहा आरोपींविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केला. गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य, शिक्षेची तीव्रता व आरोपींविरोधात पुरावे, साक्षीदार व व्यापक समाजहिताला बाधा पोहचण्याची सरकार पक्षाची भीती या सर्व बाबी लक्षात घेत न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला. (Latest Pune News)
कल्यणीनगर येथे 18 मे 2024 च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. कारचालक मुलगा व पाठीमागील आसनावर बसलेल्या त्याच्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पर्णी झाले होते.
त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी या सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे या मुलांना वाचविण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने बदलण्याकरिता विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी अगरवाल, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद व आशिष मित्तल यांच्याशी संगनमत केले.
‘ससून’मधील शिपाई अतुल घटकांबळेमार्फत रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे याला आरोपींनी लाच दिली होती.
त्या वेळी अरुणकुमारच्या सांगण्यावरून त्याच्या कार्यालयातील एका कर्मचार्याने आशिष मित्तल याला एका मुलाच्या जागी स्वतःच्या रक्ताचे नमुने देण्यासाठी पैसे दिले होते, असे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर 19 ऑगस्ट 2024 रोजी आशिष मित्तलला पोलिसांनी अटक केली. मात्र, अरुणकुमार हा पसार झाला होता. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शरण आलेल्या अरुणकुमारला 8 नोव्हेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली.