

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या किराडपुरा दंगलीची चौकशी राज्य सरकारचे अधिकारी करतील, यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे दंगलीची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत व्हावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यावर 'तुमचे पत्र मिळाले आहे, धन्यवाद' अशा एका ओळीत मला उत्तर पाठविण्यात आले. मी पंतप्रधानांची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी पत्र लिहिले नव्हते,' अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली. किराडपुरातील दंगल स्वतःचा जीव धोक्यात घालून खासदार इम्तियाज जलील यांनी रोखली. त्याबद्दल रिपब्लिकन युवा मोर्चाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, रिझवाना खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जलील म्हणाले, 'मी जे काही केलं ती जबाबदारी होती. दंगल करण्यामागे वेगळे लोक असतात. विशेष म्हणजे राजकारण्यांनी ठरवलं तर दंगलच होऊ शकत नाही. किराडपुरा भागात वर्षानुवर्षे रामनवमीनिमित्त मुस्लीम बांधव हिंदू बांधवांना शरबत वाटप करतात. मग आताच असे का घडले? दंगल सुरू होती त्या वेळी पोलिसांकडून मला अपुरी माहिती दिली जात होती. मी दुचाकीवरून थेट किराडपुरातील राम मंदिर गाठलं. त्या वेळी रस्त्यावर भयाण स्थिती होती. मंदिरात असलेले तरुण, महिला घाबरलेल्या होत्या. त्यांना मी जोपर्यंत मंदिरात आहे तोपर्यंत मंदिराला आणि तुम्हाला धक्काही लागणार नाही, असा शब्द दिला होता. दंगल होत असताना पोलिस अधिकारी कुठे गायब होते?'