

सुरेश वाणी
नारायणगाव: जुन्नर तालुक्याच्या पिंपळगाव जोगा परिसरातील पांगरी व वाटखळ परिसरामध्ये गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी दुसर्याच दिवशी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन केली. त्यांच्यासमवेत पक्षाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले व इतर कार्यकर्ते होते.
मात्र या दौर्यात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सहभागी नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ते या दौऱ्यात सहभागी नसल्यामुळे खा. कोल्हे आणि शेरकर यांच्यात काही राजकीय मतभेद निर्माण झालेत का ? किंवा विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे स्थानिक नेत्यांनी दगाफटका केल्यामुळे शेरकर नाराज आहेत का याबाबत देखील तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्यशील शेरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणुकीत शेरकर यांचा पराभव झाला असला तरी दुसर्या क्रमांकाची मते त्यांना मिळाली.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शेरकर फारसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले नाही. एवढेच काय 12 डिसेंबरला पवारांचा वाढदिवस साजरा झाला, त्यावेळेस देखील शेरकरांनी कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. शेरकर यांचे हे वागणे म्हणजे पक्षापासून दूर होण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. त्यांचे इतर कार्यकर्ते देखील पक्षापासून काही अंतरावरच राहात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात हजेरी न लावता देखील शेरकर यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मात्र आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून कारखान्याची सत्ता एकहाती आणली.
या निवडणुकीत तालुक्यातील काही राजकारणी मंडळींनी शेरकर यांना कोलदांडा घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शेरकर यांना कोलदांडा घालू पाहणारेच सपशेल आपटले. काही मंडळींनी उमेदवार उभे करून आपण शेरकर यांना शह देऊ शकतो असाही प्रयत्न केला. परंतु ते देखील यशस्वी ठरले नाहीत. शेतकरी संघटनेने देखील शेरकर यांना पाठिंबा दिला.
एकंदरीत जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सध्या अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे. ही दुफळी अशीच राहिली तर येणार्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका या पक्षाला निश्चित बसू शकतो.
खा. डॉ. अमोल कोल्हे काही तडजोडीचे राजकारण करतील का? किंवा या पक्षाचे वरिष्ठ नेते या दोघात पुन्हा ‘पॅचअप‘ करतील का? असा प्रश्न उपस्थित होत असून जर वेळीच या दोघात काही समन्वय घडवून आणला नाही तर आगामी काळात या पक्षामध्ये गटबाजी अधिक उफाळून येऊ शकते, हे नक्की.
सत्यशील शेरकर यांच्याशी आम्ही संपर्क केला होता, परंतु ते बाहेरगावी होते. मी नंतर एकटा जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करेल, असे त्यांनी सांगितले आहे.
- तुषार थोरात, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या या दौर्याबाबत मला कोणीही काहीच कल्पना दिली नाही.
- सत्यशील शेरकर, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष