जुन्नर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी विधानसभा निवडणुकीत मनापासून काम केले आहे. मतदारांचा कौल मान्य असून, तो स्वीकारला आहे. नियोजनामध्ये आपलीच काहीतरी गडबड झाली, आम्हीच कमी पडलो आहोत, हे मान्य करतो. आघाडीतील सर्व घटक पक्षातील सहकाऱ्यांना पुढे घेऊन जात असताना बांधलेली वज्रमूठ कायम ठेवून होणार्या सर्व निवडणुका लढवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
या पुढील काळात आपल्या सर्वांसाठी 24 तास कार्यरत राहणार आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यशील शेरकर यांनी नारायणगाव येथे केले. महाविकास आघाडीच्या वतीने नारायणगाव येथील जयहिंद पॅलेस येथे आयोजित “कार्यकर्ता आभार” मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी शरद लेंडे, दिलीप कोल्हे, तुळशीराम भोईर, अनंतराव चौगुले, माऊली खंडागळे, अशोक घोलप, अनिल तांबे, अंकुश आमले, मोहित ढमाले, धोंडीभाऊ पानसरे, योगेश पाटे, तुषार थोरात, गुलाब पारखे, वल्लभ शेळके, बाबा परदेशी, सैद पटेल, शरद चौधरी, मंगेश काकडे, संभाजी तांबे, बाजीराव ढोले, सुनील मेहेर, काळू गागरे, जयवंत घोडके, अशोक घोडके, दिलीप डुंबरे, श्याम माळी, प्रकाश जाधव, गेनभाऊ तट्टू, कुंडलिक गायकवाड, रंगनाथ घोलप, मोहन बांगर, समीर भगत, शांता कुटे, सुरेखा वेठेकर, सुरेखा मुंढे, अर्चना भुजबळ, धनंजय डुंबरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी शेरकर म्हणाले, निवडणुकीबाबत आपल्याला चर्चा करायची नाही. सर्वांनी मनापासून काम केले आहे. आपण सहकारातील निवडणूक आजपर्यंत लढवली आहे. राजकीय निवडणुकीचा अनुभव नव्हता, तो आता चांगला आला आहे. आता कुठल्या निवडणुकांना कमी पडणार नाही. पुढील सर्व निवडणुकीसाठी आपण सज्ज आहोत.
मतमोजणीनंतर दुसर्या दिवसापासून आपण लोकांच्या सुख दुःखात जाण्यास सुरुवात केली आहे. आता सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. निवडणुकीत बांधलेली वज्रमूठ महाविकास आघाडीला सोबत घेऊन लढायची आहे, असे शेरकर म्हणाले.
शरद लेंडे म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत मतदारांनी जो विश्वास टाकला, यापुढील काळातही तो विश्वास टिकवण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
माऊली खंडागळे म्हणाले, यशाचे सर्व धनी असतात, परंतु अपयशाचे धनी कोणी नसतं. अपयश पचवायची ताकद सर्वांमध्ये असावी लागते. ती सत्यशील शेरकर यांच्यामध्ये आहे. आपण अल्पमताने पराभूत झालो आहोत. पुढील काळात महाविकास आघाडी येणार, असा विश्वास माऊली खंडागळे यांनी व्यक्त केला.
मंगेशअण्णा काकडे म्हणाले, निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. नियोजन चांगले झाले. एकमेकांच्या गळ्यात हात घालून काम केले होते. या पुढील काळात निश्चित यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योगेश पाटे म्हणाले, पराभव मनाला न लावून घेता दुसर्या दिवशी बाहेर पडून जनतेच्या सुखदुःखात सामील होणारे मोठे ज्वलंत उदाहरण सत्यशील शेरकर यांनी घालून दिले आहे. या वेळी मोहन बांगर, सुरेखा वेठेकर आदींनी आपले विचार व्यक्त केले.