देऊळगाव राजे (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : दौंड तहसीलदार संजय पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर तब्बल एक महिन्यानंतर अरुण शेलार यांनी नियुक्ती झाली आहे. परंतु, अद्याप तालुक्यातील हजारो विद्यार्थी विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी प्रतीक्षेत आहेत. अद्यापही दाखल्यांची कामे सुरळीत चालू झाली नसल्याने तालुक्यातील हजारो विद्यार्थी व रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहेत.
सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपले असून, पुढील अॅडमिशनसाठी त्यांना नॉन-क्रिमिलेअर, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, ईडब्ल्यूएस, डोमिसाईल इत्यादी प्रकारचे दाखले तसेच गंभीर रुग्णांना शासकीय योजनांतून उपचार घ्यायचे असतील तरीही विविध दाखल्यांची गरज असते.
दौंडला नवीन तहसीलदार मिळाल्यानंतर दाखले लवकरात लवकर मिळतील, अशी आशा नागरिकांना होती. परंतु, दाखल्याचे काम अद्यापही सुरळीत झालेले नाही. परिणामी, काही रुग्णांचे नातेवाईक पाणावलेल्या डोळ्यांनी दौंड तहसीलबाहेर पडताना दिसत आहेत. दाखला देण्यास उशीर झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाईची मागणी तालुक्यातील सामान्य नागरिकांकडून होत आहे.