

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आदिवासी विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने आदिवासी विकास विभागाकडून प्रकल्प कार्यालयांतर्गत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येते. आदिवासी बजेटचा हजारो कोटी रुपये निधी खर्च करून नागापूर (ता. आंबेगाव) येथे यासाठी इमारत बांधण्यात आली. परंतु, अनेक वर्षांपासून पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची ही इमारत धूळ खात पडून आहे.
राज्यामध्ये पोलिस भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे.
त्यामुळे अकोले तालुक्यातील प्रकल्पांतर्गत असणारे पोलिस भरतीपूर्व केंद्र सुरू आहे. मात्र, कित्येक कोटी रुपये खर्च करून नागापूर येथे बांधलेली भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची इमारत धूळ खात पडून आहे. हे केंद्र बंद राहण्याला शासनाची अत्यंत कमी तरतूद असल्याचे कारण आहे. कमी तरतुदीमुळे हे प्रशिक्षण केंद्र चालवायला घेण्यासाठी कोणीही तयार होत नाही. याबाबतचा पाठपुरावा अनेक दिवसांपासून बिरसा ब्रिगेड आंबेगाव तालुक्याच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी विभागाचे प्रकल्पाधिकारी बळवंत गायकवाड यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची बिरसा ब्रिगेडचे महाध्यक्ष शशिकांत करवंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांनी भेट घेतली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी आकस्मिक खर्चाची तरतूद करण्याबाबत झिरवळ यांनी आदिवासी सचिव यांच्याशी चर्चा केली होती. या वेळी बिरसा ब्रिगेडचे आंबेगाव तालुकाध्यक्ष आनंद मोहरे, कार्याध्यक्ष सनी असवले, सचिव प्रवीण वाजे, मातृशक्ती उमाताई मते, ज्ञानेश्वर अनेक कॅगले तसेच आदिवासी विचार मंचचे प्रदीप पारधी व मच्छिंद्र लोहोकरे उपस्थित होते. दुसरीकडे, ही बंद पडलेली इमारत सुरू करावी, अशी मागणी पुणे जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजयशेठ थोरात यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आदिवासी विभागाचा लाखोंचा निधी पाण्यात
विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र सुरू करण्याची मागणी
बिरसा ब्रिगेडने घेतला पुढाकार