मंचर; पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील हजारो एकरातील पिके धोक्यात आली आहेत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीअभावी कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय प्रलंबित आहे. कुकडी प्रकल्पातील वडज, येडगाव, पिंपळगाव जोगे, हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) या धरणात यावर्षी शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. मीना, घोडनदी, कुकडी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांना ढापे टाकल्याने नदीत पाणी साठले आहे. तसेच उजव्या कालव्याच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. डिंभे धरण उजव्या कालव्याचा उपयोग आंबेगाव, शिरूर तालुक्याच्या पूर्व भागालाही होतो.
धरणाच्या उजव्या कालव्यामुळे अनेक गावे बागायती झाली आहेत. या गावांत ऊस, तरकारी पिके, चारा पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. परंतु, सध्या उजव्या कालव्याच्या खाली येणार्या गावांमध्ये पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. पिकांना पाणी कमी पडत आहे, त्यामुळे येथील पिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडणे गरजेचे आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.
कुकडीचे पाणी वितरणाचे वेळापत्रक जाहीर होईना
रब्बी हंगाम सुरू होऊन एक महिना झाला तरी कुकडी प्रकल्पातील पाणी वितरणाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पाणी वितरणाचे वेळापत्रक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणे गरजेचे आहे. परंतु, डिसेंबर सुरू झाला तरी अद्याप कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यांतील हजारो शेतकर्यांचे लक्ष पाणी केव्हा सोडले जाणार याकडे लागले आहे.