ताथवडे : पुढारी वृत्तसेवा : दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा आणि अत्यावश्यक मानला जाणारा दस्तावेज म्हणजे आधारकार्ड होय. बँकिंग व्यवहारापासून ते अनेक सरकारी कामासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, पुनावळेतील मनपा शाळेमध्ये असणारे आधार केंद्र हे आता ताथवडेमध्ये स्थलांतरित झाल्याने पुनावळेकरांची गैरसोय होत आहे. परंतु हेच आधारकार्ड मिळविण्यासाठी पुनावळे येथील नागरिकांची धावपळ होत आहे. आधार केंदावर नागरिकांची होणारी गर्दी आणि यामुळे विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास, यामुळे शाळेमध्ये असणारे आधार केंद्र त्वरित स्थलांतरित करावे, असे आदेश आयुक्तांनी दिल्याने येथील मनपा शाळेतील आधारकेंद्र आता ताथवडेतील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पुनावळेमध्ये अनेक उच्चभ्रू सोसायट्या आहेत.
यामध्ये राहत असणारे आयटीयन्स, परप्रांतीय तसेच गावातील स्थानिक रहिवाशी यांना नवीन आधारकार्ड काढणे, ते अद्ययावत करणे, जन्मतारीख, मोबाईल नंबर बदलणे आदी गोष्टींसाठी आता ताथवडेमध्ये जावे लागते. नागरिकांची आधारसाठी शाळेमध्ये होणारी गर्दी व त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रास यासाठी स्थलांतरित करण्यात आलेले हे केंद्र पुन्हा शाळेतच सुरू केल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पुनावळेमधील आधार केंद्राच्या तुलनेत ताथवडेमध्ये नागरिकांची गर्दी जास्त असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी कित्येक तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता पुन्हा पुनावळे येथील आधारकेंद्र चालू करावे, अशी मागणी पुनावळे येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना त्रास होत नाही का ?
आधार केंद्र चालू करण्यासाठी पुनावळेमध्ये शासकीय जागा न मिळणे, हे एक प्रमुख कारण होते. शालेय विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून पुनावळे मनपा शाळेतील स्थलांतरित केलेले आधार केंद्र ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेतच चालू केले. आता जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांना आधार केंद्रातील नागरिकांच्या गर्दीचा त्रास होत नाही का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
आधारकार्ड सगळीकडे सक्तीचे करण्यात आलेले आहे. पुनावळेमधून हे केंद्र दुसरीकडे गेल्याने आम्हा सर्वांची गैरसोय झालेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वात जास्त त्रास होत आहे. तसेच शाळेत नको म्हणून दुसर्या गावातील शाळेतच आधार केंद्र सुरू करणे बुद्धीला न पटण्यासारखे आहे. पुनावळेत शाळा सोडून अनेक शासकीय जागा आहेत, त्या ठिकाणी हे आधार केंद्र पुहा सुरू करता येईल.
– सूरज पांढरे, स्थानिक रहिवाशी पुनावळे