

पुणे; पुढारी वृत्तसेवा: प्राथमिक शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच अनुकंपा तत्त्वावर शिक्षणसेवक पदासाठीही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, अनुकंपा तत्त्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देताना संबंधित उमेदवार टीईटी उत्तीर्ण असण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामविकास विभागाकडून सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना या संदर्भातील निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. अनुकंपा तत्त्वावरील शिक्षणसेवक नियुक्तीसाठी उमेदवाराला टीईटी आणि केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीत सवलत असेल किंवा कसे याबाबत ग्रामविकास विभागाने शालेय शिक्षण विभागाकडे अभिप्राय मागवला होता.
प्राथमिक शिक्षक पदासाठी टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 2016 च्या शासन निर्णयाने उद्भवलेल्या त्रुटी दूर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षकांची पात्रता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) निश्चित केली आहे. त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनुकंपावर शिक्षक पदासाठी नियुक्ती देताना उमेदवार टीईटी उत्तीर्ण असण्याची दक्षता घ्यावी, असा अभिप्राय शिक्षण विभागाने दिला. त्यामुळे आता टीईटी उत्तीर्ण उमेदवारांनाच अनुकंपा तत्त्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्ती दिली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.