

प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: आजचा शिक्षक वर्गात जाऊन फळ्यावर ‘अक्षर’ गिरवण्यापेक्षा मोबाईलवर सरकारी ‘ॲप्स’च्या आकडेमोडीत जास्त व्यस्त दिसत आहे. राष्ट्राचा कणा घडवणारा शिक्षक आज स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईत आणि प्रशासकीय गुलामगिरीत अडकला आहे. शासनकर्त्यांनी लादलेले हे ‘अतिरिक्त कामा’चे ओझे भविष्यातील पिढीच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी घातक ठरत आहे. शिक्षकांच्या हातात खडूऐवजी सरकारी फाइल्स आणि मोबाईल आले असून, उद्याची पिढी घडविणारे गुरुजी आज सरकारी धोरणाच्या चक्रव्यूहात अडकून ‘क्लार्क’ बनले आहेत, हे विदारक सत्य नाकारून चालणार नाही.
शिक्षकाचे मूळ काम अध्यापन आहे; मात्र सध्या त्यांना अशैक्षणिक कामांच्या विळख्यात ओढले गेले आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश होतो : निवडणूक कामे -मतदार याद्या अद्ययावत करणे, घरोघरी जाऊन माहिती गोळा करणे आणि मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणे.
डिजिटल ओझे- णऊखडए, पोषण ट्रॅकर, लाडकी बहीण योजना यांसारख्या शेकडो ॲप्सची माहिती भरणे. शालेय पोषण आहार-अन्नाचा दर्जा तपासणे, त्याचे रेकॉर्ड ठेवणे, इंधनाची सोय आणि हिशोब ठेवणे. हे काम एखाद्या कूकचे की शिक्षकाचे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. इतर सर्वेक्षणे-जनगणना, आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणे आणि सरकारी कार्यक्रमांसाठी गर्दी जमवणे, हे देखील काम करावे लागत आहे.
ज्या शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या पाठांतराची आणि प्रगतीची चिंता असायला हवी, तो शिक्षक आज ‘डेडलाइन’ पूर्ण करण्याच्या तणावाखाली वावरत आहे. हे केवळ शिक्षकांचे शोषण नाही, तर शिक्षणाचे अध:पतन आहे. एकूणच शिक्षक हा समाज घडवणारा शिल्पकार आहे. त्याला प्रशासकीय कामांतून मुक्त करून पुन्हा त्याचा मूळ अधिकार ‘शिकवण्या’साठी बहाल करणे गरजेचे आहे. अन्यथा, येणारी पिढी या शैक्षणिक धोरणाच्या विस्कळीतपणाबद्दल शासनकत्र्यांना कधीच माफ करणार नाही!
शासनकर्त्यांना थेट सवाल
शिक्षकांना ‘क्लार्क’ बनविणाऱ्या धोरणावर आता समाजात संतप्त प्रश्न विचारले जात आहेत. शिक्षकांना ‘शिक्षक’ म्हणून नेमले असताना, त्यांची नियुक्ती ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ म्हणून कधीपासून झाली? जर शिक्षकांनीच सर्व प्रशासकीय कामे करायची असतील, तर शिक्षण विभागातील इतर यंत्रणा नक्की काय करते? ज्या दिवशी शिक्षक केवळ सरकारी आदेश पाळण्यात वेळ घालवेल, त्या दिवशी देशाचे भवितव्य कोणाच्या हातात असेल?