

कमलाकर होवाळ
माणगाव : कोकणातील पर्यटन आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सहा तरुणांचा दरीत कोसळून अंत झाला. पुणे उत्तमनगर येथून १७ नोव्हेंबररोजी रात्रीच्या सुमारास थार गाडीतून कोकणात निघालेल्या पर्यटकांची गाडी ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळील अतिअवघड वळणावर ५०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघाताने रायगड जिल्हा आणि पुणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात प्रथम शहाजी चव्हाण (वय २२, रा. दत्त मंदीरा जवळ, भैरवनाथ नगर, कोंढवे धावडे, पुणे) पुनित सुधाकर शेट्टी ( वय २०, रा. पाण्याचे टाकीजवळ, कोपरेगाव, उत्तमनगर पुणे), साहिल साधू बोटे (वय २४, रा. कोपरेगाव, उत्तमनगर पुणे), महादेव कोळी (वय १८, रा. कोपरेगाव शाळेमागे, भैरवनाथ नगर, पुणे) , ओंकार सुनिल कोळी (वय १८, रा. कोपरेगाव शाळेमागे, भैरवनाथ नगर, पुणे), शिवा अरुण माने (वय १९, रा. पुणे) या सहा तरुणांचा मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
पुण्यातील १८ ते २४ वयोगटातील सहा तरुण १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुण्याहून (एम एच. १२ वाय ऐन. ८००४) या थार गाडीतून कोकणात येत होते. ताम्हिणी घाटातील कोंडेथर येथे उताराचा धोकादायक भाग असून या वळणावर लोखंडी संरक्षण कठडा बसवण्यात आला आहे. हा संरक्षित कठडा तोडून गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोबाईल कॉल न लागल्याने नातेवाईक व मित्रांनी वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, तसेच सोशल मीडिया, व्ह़ॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या तरुणांकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने चिंतेचे सावट पसरले. अखेर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वारजे उत्तमनगर पोलीस ठाण्यात हे सहा जण हरवले असल्याची तक्रार पुणे शहर उत्तमनगर पोलीस ठाणे येथे १७ नोव्हेंबर २०२५ रोजी नोंदविण्यात आली.
१९ नोव्हेंबरच्या रात्री माणगाव पोलिसांनी ताम्हिणी घाटात शोधमोहीम सुरू केली. तेव्हा एका अवघड वळणावर लोखंडी संरक्षण कठडा तुटलेला आढळला. ड्रोन उड्डाण केल्यानंतर घनदाट झाडीत थार कारचा एक भाग चमकताना दिसला व अपघात निश्चित झाला. रात्र झाल्याने तपास मोहीम थांबवावी लागली; मात्र २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० पासून पुन्हा मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.
माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, महामार्ग वाहतूक शाखेचे अधिकारी, माणगाव तहसीलदार व त्यांचे महसूल कर्मचारी, रोहा येथील सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे समर्पण रेस्क्यू टीम, तसेच आपत्ती व्यवस्थापन दल यांनी संयुक्तपणे ३०० फुटांच्या दरीत उतरत जीवघेणा शोध सुरू केला. या मृतदेहाजवळ पोहोचण्यासाठी झाडे - झुडपे कापत रस्ता तयार करून, उंच दगडी तीव्र उतार पार करत रेस्क्यू टीम मृतदेहांपर्यंत पोहोचली. दुपारी ३.१५ वाजण्याच्या दरम्यान दरीतील झाडा झुडपात विखुरलेल्या अवस्थेत सहाही तरुणांचे मृतदेह मिळाले. ते सर्व मृतदेह बाहेर काढण्याचे काम रेस्क्यू ऑपरेशन चालू होते.
दरीत सर्वत्र घनदाट झाडी असल्याने मानवी दृष्टी पोहोचणे अशक्य होत होते. ड्रोनच्या मदतीने गाडीचे भाग, मृतदेहांची जागा आणि उताराचा अंदाज घेण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण ऑपरेशनला गती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच माणगाव तालुक्यातील नागरिक आणि पुणे इथून आलेले मृत तरुणांचे नातेवाईक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले होते. या पर्यटक तरुणांचे वय १८ ते २४ दरम्यान असून आयुष्याची सुरुवातही नीट पाहू न शकलेल्या या सर्वांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.
जीर्ण झालेले संरक्षण कठडे, असुरक्षित वळणे, रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था नसणे आणि वाढती वाहतूक या सर्व बाबींची मोठी पुनर्पडताळणी होण्याची आवश्यकता आहे. ही दुर्घटना ताम्हिणी घाटातील सुरक्षिततेची दयनीय अवस्था उघड करते आणि प्रशासन तसेच हा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असल्याने या विभागावर मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहे.