

दीपक सोनवणे
पौड: पश्चिम महाराष्ट्रात गेल्या ४ आठवड्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे ते ताम्हिणी घाट हा मुख्य रस्ता २५ दिवसांपासून पूर्णतः बंद आहे. डोंगरवाडी ते निवेदरम्यान रस्ता वाहून गेल्याने प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी घाटात प्रवेशबंदी केली आहे. याचा थेट फटका मुळशीतील पळसे धबधबा परिसरातील छोटे व्यावसायिक, हॉटेल, ढाबा आणि भुट्टा विक्रेत्यांना बसला आहे.
पळसे येथे रस्त्यालगत आकर्षक असा धबधबा आहे. पर्यटकाचे आवडते ठिकाण पळसे धबधबा असून, हा धबधबा पाहण्यासाठी तसेच पाण्यात चिंब भिजण्यासाठी पर्यटक पुणे आणि पिंपरी-चिंचवडहून येथे येतात.
मात्र पळसे धबधब्याजवळ असलेल्या वळणावरच तसेच डोंगरवाडीजवळ ओढ्यावर रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगत गेल्या २५ दिवसांपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने याचा थेट फटका पर्यटनाला बसून व्यावसायिक आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.
पीक सीझनमध्ये शुकशुकाट
पावसाळा म्हणजे मुळशी आणि ताम्हिणी परिसरासाठी ‘गोल्डन सीझन’. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमधून दररोज हजारो पर्यटक मुळशी धरण, पळसे, भिरा, ताम्हिणी येथे धबधबे पाहायला येतात. परंतु, यंदा रस्ता बंद असल्याने गेल्या २५ दिवसांपासून पर्यटक या भागात आलेले नाहीत. यामुळे पळसे गावाजवळील धबधब्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली ३० हून अधिक छोटी दुकाने, चहा-नाष्ट्याच्या टपऱ्या, भुट्टा भाजण्याचे गाडे आणि पार्किंगचे स्टॉल सध्या पूर्णपणे बंद आहेत.
२ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान
स्थानिक ग्रामस्थांच्या मते शेडाणी फाटा, मुळशी, पळसे आणि ताम्हिणी घाट परिसरातील २०० ते २५० कुटुंबांचा रोजगार थेट पर्यटनावर अवलंबून आहे. मागील २५ दिवसांत सुमारे २ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.