

Talegaon rail connectivity project
पुणे: तळेगावपासून सुरू होणार्या रेल्वेच्या दोन प्रस्तावित मार्गांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तळेगावपासून सुरू होणार्या पुणे-अहिल्यानगर आणि मिरज मार्गाला जोडणारा असे हे दोन मार्ग असून, त्यासाठीचे भूसंपादन लवकरच केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 25) दिली.
रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या पुणे ते अहिल्यानगर या रेल्वेमार्गासंदर्भातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन नवीन रेल्वेमार्गांची आखणी करण्यात येत आहे. तसेच, राज्य सरकारकडून पुण्यासाठी दोन रिंगरोड तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ताथवडे येथून सातारा रस्त्याला जोडणारा नवा रुंद मार्ग तयार करण्यात येत आहे. (Latest Pune News)
या रस्त्यातील भुयारी मार्गदेखील रुंद केले जाणार आहेत. चिंचवड येथील पादचारी पूल काढून नव्याने 40 कोटी रुपये खर्च करून नवीन पूल तयार करण्यात येणार आहे. बंगरूळु महामार्गावरील मुकाई चौक ते मुळा नदी वाकडपर्यंत 24 मीटर रुंदीचा सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर या कामालादेखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी बर्यापैकी कमी होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
उरुळी कांचनमध्ये शंभर हेक्टरवर मेगा टर्मिनल
पुणे ते अहिल्यानगर या नवीन मार्गासाठी तळेगाव ते उरुळी कांचन या 75 किलोमीटरच्या मार्गासाठी उरुळी कांचन येथे शंभर हेक्टरवर मेगा टर्मिनल उभारण्यात येत आहे. यासंदर्भात रेल्वे विभागाने दिलेल्या आराखड्यानुसार लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हा रेल्वेमार्ग पुढील चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून, भूसंपादनासाठी शेतकर्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
मिरज मार्गाला जोडणारा नवीन मार्ग
रेल्वे मंत्रालयाने मिरज मार्गाला जोडणारा नवीन मार्गदेखील प्रस्तावित केला आहे. त्याचे काम पुढील पाच वर्षांत करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील भूसंपादनही लवकरच सुरू करण्यात येईल. या कामामुळे पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे, असेही पवार यांनी सांगितले
...असा असणार पुणे ते अहिल्यानगर रेल्वेमार्ग
रेल्वेमार्ग करताना तळेगावपासून चाकण, आळंदी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, सुपे, चास व अहिल्यानगर असा केला जाणार आहे. यात एकूण आठ स्टेशन असतील. यामुळे चाकण, शिक्रापूर, रांजणगाव तसेच अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्यांना रेल्वेचा फायदा होणार आहे. त्यासाठी तळेगाव ते उरुळी कांचन हा 75 किलोमीटरचा मार्ग नव्याने करण्यात येणार आहे.
हा मार्ग सोलापूर मार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्यात यावे, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. संपादित करण्यात येणार्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकर्यांना योग्य तो दर दिला जाईल. संपादन लवकरच सुरू करण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निर्देश देण्यात आले आहेत. हे काम पुढील चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी तळेगाव येथे न्यू तळेगाव व उरुळी कांचन येथे नवीन स्टेशन उभारले जाणार आहे, असे पवार यांनी सांगितले..