पौड (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : मुळशी धरणग्रस्तांचे पुनर्वसन, मुळशी-वाघवाडी पूल, कुंभेरी-तिस्करी-आंबवणे पूल, नागरी सुविधांसाठी माजी आमदार शरद ढमाले यांनी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाला मुळशी खुर्द ते वडगाव-वाघवाडी जलतरण प्रवास आंदोलन केले. या वेळी व्यथित धरणग्रस्तांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष, टाळाटाळ करणा-या टाटा पॉवर कंपनी, तसेच प्रशासनातील अधिका-यांचा प्रतिकात्मक तेरावा विधी घालून निषेध केला. आंदोलनास सर्वपक्षीय पदाधिका-यांनी पाठिंबा दिला. आंदोलनाच्या सुरवातीस माले (ता. मुळशी) येथील सेनापती बापट स्मारकस्तंभास अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर मुळशी खुर्द (ता. मुळशी) येथील पुलाच्या नियोजित जागेवरून माजी आमदार शरद ढमाले यांनी पलीकडच्या वडगाव तीरावरील ठिकाणापर्यंत जलतरण प्रवास आंदोलन केले. या वेळी टाटा कोयना पाणी संघर्ष समितीचे प्रफुल्ल कदम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, बाळासाहेब चांदेरे, शिल्पा ठोंबरे, शंकर मांडेकर, श्रीकांत कदम, विनायक ठोंबरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक करंजावणे, शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख सचिन खैरे, राम गायकवाड, वैशाली सणस, विजय ढमाले, अनंत ढमाले, अमित कंधारे, जितेंद्र इंगवले, समीर सातपुते, विजय दळवी, रविकांत धुमाळ, सुभाष वाघ, प्रशांत रानवडे, रामचंद्र देवकर, हनुमंत सुर्वे, दत्ता जाधव, बाळासाहेब कुरपे, प्रमोद बलकवडे आदींनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.
माजी आमदार शरद ढमाले म्हणाले, मटाटांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीवरून ठोकशाहीपर्यंत जाण्याची वेळ आणू नये. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, संबंधित मंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. धरणग्रस्तांच्या न्याय्य मागण्या, काम पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार आहे. टाटा कोयना पाणी संघर्ष समितीचे प्रफुल्ल कदम म्हणाले, मटाटा कंपनीने स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत दर युनिट पाच पैसे विद्युत उत्पादनावर भरायची रॉयल्टी भरलेली नाही. रॉयल्टीची ही रक्कम प्रचंड मोठी आहे. टाटा कंपनीकडून ही रॉयल्टी वसूल करून धरणग्रस्तांसाठी, सुविधांसाठी वापर करता येईल. महाराष्ट्राच्या अनेक समस्या सुटतील.
महसूल विभागाच्यावतीने तहसीलदार रणजित भोसले यांनी भेट देऊन भावना जाणून घेतल्या. नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, मंडल अधिकारी योगेश थिटे उपस्थित होते. पौड पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला. मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे पथक तैनात होते.
सद्य:स्थितीत कोकणात जाताना मुळशी धरणाच्या पाणीसाठ्याच्या कडेने वेढा घालत जावे लागते. मुळशी-वाघवाडी-वडगाव पूल झाल्यास पुणे ते कोकण महामार्गाने जाणा-या प्रवाशांचे 11 किलोमीटरचे अंतर वाचेल. तसेच मुळशी धरण भागातील गावांचा सुमारे 25 किलोमीटर अंतराचा वेढा वाचेल. त्यामुळे इंधन व वेळेची बचत होईल.
– सुनील चांदेरे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक