

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी पुण्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक घेत पक्षसंघटना, इच्छुक उमेदवार आणि महायुतीतील जागा वाटपावर सविस्तर चर्चा केली. पुण्यातील बारामती होस्टेल येथे झालेल्या या बैठकीला पुणे जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, तालुकास्तरीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी विधानपरिषद निवडणुकीत पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी, यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले. ‘पुण्याच्या जागेवर आमचा हक्क आहे,’ अशी स्पष्ट भूमिका कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीनंतर मांडली.
शहरातील की ग््राामीण भागातील उमेदवार द्यायचा? याचा अंतिम निर्णय ‘वहिनी’ म्हणजेच सुनेत्रा पवार घेतील, असेही त्यांनी सांगितले.भरणे यांनी सांगितले की, बैठकीत जिल्ह्यातील संघटना मजबुतीकरण, तालुकानिहाय आढावा आणि निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांशी चर्चा करण्यात आली. उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आल्याचेही त्यांनीस्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पुढील चर्चा करून महायुती अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.‘खूप जण इच्छुक आहेत. प्रत्येक पक्षाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. रायगड असो किंवा इतर कोणतीही जागा, त्याबाबत महायुतीच निर्णय घेईल,’ असेही भरणे म्हणाले.
दरम्यान, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भरणे यांनी परभणीतील इंधन तुटवड्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून, नागरिकांनी घाबरून रांगा लावण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खतटंचाईबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुनील तटकरे यांच्यासोबत कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करीत आमच्यात कोणताही मतभेद नाही, असे भरणे यांनी म्हटले; तर संजय शिरसाट यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, ‘ते मोठे नेते आहेत, आमचा कोणताही आमदार कुणाशी संपर्कात नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.