निरा डावा कालव्यातून उन्‍हाळी आवर्तन सुरू; शेतकर्‍यांमध्ये समाधान

निरा डावा कालव्यातून उन्‍हाळी आवर्तन सुरू; शेतकर्‍यांमध्ये समाधान
Published on
Updated on

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात निरा डावा कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने या परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. पाणी आल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा, तसेच जनावरांच्या चार्‍याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात का होईना मार्गी लागण्यास मदत होईल, अशी आशा देखील शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. सध्या उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाल्याने इंदापूर तालुक्यातील गावोगावी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्न झालेला आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचे टँकरदेखील सुरू झालेले आहेत. पाण्याच्या शोधार्थ शेतकरी लाखो रुपये खर्च करून कूपनलिका, विहिरी घेत पाणी उपलब्ध करण्यासाठी धडपड करत आहेत.

सध्या निरा डावा कालव्यातून इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात आवर्तन सुरू झाले आहे. तालुक्यातील निरा डावा कालव्याच्या फाटा क्रमांक 59, 57, 55, 54 वरील गावांना तसेच अंथुर्णे, शेळगाव, गोतोंडी, निमगाव केतकी, वरकुटे, निमसाखर, शिरसटवाडी, हगारेवाडीसह अन्य भागांना पाणी मिळत आहे. काहीअंशी पिण्याच्या पाण्याचा, जनावराच्या चार्‍याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान कालव्यातून इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात सोडलेले पाण्याचे आवर्तन हे किती दिवस सुरू राहील, याबाबत मात्र निश्चित माहिती दिली गेली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

इंदापूर तालुक्यातील निरा डावा कालव्याच्या फाटा क्रमांक 59, 57, 55, 54 ला सोडलेले आवर्तन हे पिण्याच्या पाण्यासाठी तसेच कालाव्यालगत भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ होण्याकरिता आहे. एकूण 6 ते 7 दिवसांचे हे आवर्तन असून त्यानंतर ते बंद करण्यात येणार आहे.

– दशरथ एकतपुरे, उपअभियंता, निमगाव केतकी, जलसंपदा उपविभाग

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news