

सुरेश वाणी
नारायणगाव: यंदाच्या वर्षी उसाला सर्वत्र तुरे आल्यामुळे उसाच्या वजनावर परिणाम होऊन सर्वच साखर कारखाने लवकर बंद झाले. यासह ऊस लागवडीचे क्षेत्र कमी होऊ लागल्यामुळे साखर कारखान्यांची चिंता वाढलेली आहे. पुढील गळीत हंगाम सुरू होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी असल्यामुळे या मधल्या काळात गळीत हंगामासाठी उसाच्या लागवडीसाठी खास प्रयत्न करावे लागणार आहेत.
यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखाने ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकले नाहीत. उसाच्या पळवापळवीबरोबरच उसाला तुरे जास्त आल्यामुळे आणि उसाचे वजन घटल्याने साखर कारखाने देखील लवकर बंद झाले आहेत. यंदाच्या वर्षी साखरेच्या उताऱ्यावर देखील परिणाम झाला आहे. एकंदरीत, यंदाचा गळीत हंगाम साखर कारखानदारांबरोबरच ऊस उत्पादकांना देखील तोट्यात गेला आहे.
पुढील वर्षी सर्वच साखर कारखान्यांना उसाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासणार आहे. आडसाली व पूर्वहंगामी या उसाची देखील लागवड कमी झाली आहे. सध्या सुरू ऊस लागवडीचा हंगाम चालू असला तरी उन्हाची तीवता असल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड जरी केली तरी उसाच्या उगवणीवर उन्हाचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे सुरू उसाची देखील लागवड कमी होत आहे. खोडवा ऊस काढून टाकण्याचे प्रमाण शेतकरीवर्गाचे जास्त पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी उसाची कमतरता भरून काढण्यासाठी साखर कारखान्यांना ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्यासाठी विविध योजना जाहीर कराव्या लागण्याची शक्यता आहे.
बहुतांश साखर कारखाने आडसाली उसावर भर देत असतात. पूर्व हंगामी उसाची लागवड देखील अधिकची होत असते. त्यामानाने सुरू उसाची लागवड कमी होत असते. आडसाली ऊस लागवडीचा कालावधी जून ते ऑगस्ट असतो व पूर्व हंगामी ऊस लागवडीचा कालावधी तीन महिन्यांचा म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतचा असतो. जानेवारीपासून सुरू उसाची लागवड चालू होत असते.
जानेवारी ते मार्चपर्यंत सुरू उसाची लागवड होते, त्यानंतर मात्र पाण्याची कमतरता व उसाला खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी सुरू ऊस लागवडीकडे काणाडोळा करतात. त्यामुळे बहुतांश साखर कारखाने आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडीकडे भर देतात. जिल्ह्यामध्ये खासगी साखर कारखाने वाढल्यामुळे उसाची होणारी पळवापळव व कमी क्षेत्रात उसाची लागवड झाल्याने साखर कारखान्यांना ऊस लागवड प्रोग््रााम मोठ्या प्रमाणात राबवावा लागणार आहे.
दरम्यान, ऊस लागवड क्षेत्र वाढावे, यासाठी सर्व साखर कारखाने आडसाली उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी अनुदान तसेच आडसालीचे जास्त टनेज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस योजना राबवू शकतात तसेच पूर्वहंगामी उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील साखर कारखाने बक्षीस योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर खोडवा ऊस ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीची योजना अथवा बक्षीस योजना राबवली जाऊ शकते.
सन 2026 च्या गळीत हंगामामध्ये उसाचे एकरी उत्पन्न अवघे 40 ते 42 टन आल्याने गळीत हंगाम लवकर आटोपता घ्यावा लागला आहे, तसेच यंदाच्या हंगामाचे उद्दिष्ट देखील सर्व साखर कारखाने पूर्ण करू शकले नाहीत. पुढील वर्षी देखील उसाची कमतरता भासणार असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड अधिकची करावी, यासाठी शेतकी विभागाकडून विविध योजना राबविल्या जाणार आहेत. आडसाली, पूर्वहंगामी व सुरू उसाची लागवड जास्त होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यंदा तुटलेल्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी राखावा, यासाठी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना शेतकी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत विनंती केली जाणार आहे. पुढील वर्षी उसाची लागवड जास्त व्हावी, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांसाठी अधिकच्या सवलती देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.
सत्यशील शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर सहकारी साखर कारखाना