पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी 30 चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या आणि गेले सहा महिने रखडलेल्या 'एटीएमएस' (अॅडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) यंत्रणेची चाचणी अखेर सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही यंत्रणा कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी दिली आहे. दरम्यान, दुसर्या टप्प्यात शहरातील 46 चौकांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
शहरात खासगी वाहनांची दिवसेंदिवस वाढत असल्याने रस्ते अपुरे पडत आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून संयुक्तपणे उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील प्रमुख 125 चौकांमध्ये पुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक 'एटीएमएस' सिग्नल बसविले जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, डेक्कन, टिळक चौक (अलका चौक), एस. पी. चौक, स्वारगेटपासून सोलापूर रस्त्यावरील बी.टी. कवडे चौक या दरम्यानच्या 30 चौकांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यंत्रणा बसविण्याचे काम जवळपास एक वर्षापासून सुरू होते. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून मुहूर्तावर मुहूर्त सांगितले जात होते. अनेक मुहूर्त सांगितल्यानंतर अखेर या यंत्रणेची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चाचणी अहवाल आल्यानंतर त्रुटी दूर करून ही यंत्रणा कायमस्वरूपी सुरू करण्यात येणार आहे.