मंचर : आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसगाड्या गेल्याने आंबेगाव तालुक्यातील एसटी सेवा बुधवारी (दि. 17) दिवसभर ठप्प झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. एसटी सेवा बंद असल्याचा फायदा उचलत खासगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारून एक प्रकारे लूट केल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्यभरातून एसटी बसगाड्या गेल्याने त्या अनुषंगाने आंबेगाव तालुक्यात प्रवाशांना एसटी सेवा देणार्या मंचर, राजगुरुनगर, नारायणगाव आगाराच्या एसटी गाड्या पंढरपूर येथे गेल्या आहे. उपलब्ध एसटी बसगाड्या पंढरपूर येथे गेल्याने तालुक्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
अनेक भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरप्रमाणे आळंदी येथे संत श्रीज्ञानेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी आळंदी येथे जातात. त्यासाठी खेड्यातून जाणार्या भाविकांना गाड्या उपलब्ध नसल्याने त्यांना प्रवास करण्यासाठी मोठी अडचण झाली. शिवाजीनगर एसटी आगाराच्या पुणे भीमाशंकर किंवा काही मुंबई एसटी आगाराच्या जेमतेम फेर्या आल्याचे मंचर बसस्थानक प्रमुख साधना कालेकर यांनी सांगितले.
सद्यस्थितीत पारगाव, घोडेगाव, म्हाळुंगे पडवळ, सातगाव पठार, रांजणी, पोखरी, घोडेगाव, लोणी लाखनगाव आदी गावांतून प्रवाशांना मंचर किंवा घोडेगाव बसस्थानकावर येण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. एसटी सेवा ठप्प झाल्याचा फायदा उठवत अनेक खासगी वाहनचालकांनी मनमानी करत आवाच्यासव्वा भाडे घेतल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. पंढरपूर यात्रेसाठी महामंडळांने जादा बसगाड्या उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र आहे त्या एसटी बसगाड्याच आहेत.