

ST daily revenue falls to 5 crore
अनिल सावळे पाटील
जळोची: आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटीला तारणारा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणारा महसूल गेला दीड महिना सातत्याने कमी होत चालला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांचा अभ्यास केला, तर एसटीच्या दैनंदिन उत्पन्नातील तूट पाच कोटींवर गेली असून, एसटीसाठी वाट खडतर असल्याची चिंता महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचारी करीत आहेत.
एसटीची या वर्षाच्या सुरुवातीला झालेली भाडेवाढ लक्षात घेतली, तर उद्दिष्टाच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न प्रतिदिन साधारण 32 कोटी 36 लाख रुपये इतके मिळायला हवे; पण ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांचा आढावा घेतल्यास प्रत्यक्षात मात्र सरासरी 27 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळत असून, पाच दिवसांत साधारण 25 कोटी रुपयांची तूट आलेली दिसत आहे. (Latest Pune News)
गेल्या 40 वर्षांतील ही सर्वांत मोठी तूट असून, आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असल्याचे दिसून येत आहे. संचित तोटा 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, तो एसटीसाठी धोक्याची घंटा आहे.
विशेष म्हणजे, तिकीटविक्रीतून मिळणार्या महसुलामध्ये सातत्याने का घट होत आहे? याची कारणे शोधण्याऐवजी प्रवासीसंख्या कमी झाल्याचे कारण सांगत एसटीच्या व्यवस्थापनाने आपली अकार्यक्षमता स्वतःच सिद्ध केली आहे. गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने उत्पन्न कमी होत आहे, हे दिसत असूनही कोणतीही प्रभावी उपाययोजना एसटीच्या प्रशासकीय पातळीवर केल्याचे दिसून येत नाही.
अजूनही कर्मचार्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली साधारण 2 हजार 500 कोटी रुपयांची पी. एफ. व ग्रॅज्युटी रक्कम संबंधित ट्रस्टकडे भरणा करण्यात आलेली नाही. गणेशोत्सव तोंडावर आला असताना कर्मचार्यांना उचल देण्यासाठी निधी नाही.
दर महिन्याला सरकारकडून येणार्या सवलतमूल्य प्रतिपूर्ती रकमेतून वेतन देण्यात येत आहे व आर्थिक जखमेवर वरवरची मलमपट्टी करण्यात येत आहे. पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने कर्मचार्यांना थकीत महागाईभत्ता फरक व वेतनवाढ फरकाची रक्कम अजूनही देण्यात आलेली नसून दिवसेंदिवस वाढत्या महागाईने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
या सर्व आर्थिक अडचणींतून मार्ग काढायचा असेल, तर सरकारच्या आर्थिक मदतीसोबत एसटीने स्वतः उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. पण, तसे होताना दिसत नाही. व्यवस्थापन हतबल दिसत असून, झोपेचे सोंग घेऊन सुस्त बसलेल्या व्यवस्थापनाला आता गोरगरिबांची एसटी वाचवायची असेल, तर जनतेनेही जाब विचारायला हवा हे नक्की.
उन्हाळी सुटीनंतर अपेक्षित उत्पन्न नाही
दरवर्षी जून व जुलै महिन्यात उन्हाळ्याची सुटी आटोपून प्रवासी परतीचा प्रवास करतात. या कालावधीत चांगले उत्पन्न मिळत असते. मात्र, त्या दोन्ही महिन्यांत देखील उद्दिष्टांच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळाले नसून अशीच परिस्थिती पुढे राहिली व त्याचप्रमाणे संचित तोटा वाढत राहिला, तर एसटीची वाट बिकट असणार आहे.
एसटी म्हणजे लोकप्रिय घोषणांचा पाऊस करायचा व देणी द्यायची नाहीत. राजकारणी व अधिकारी यांनी भ्रष्टाचार करायचा व प्रवासी जनतेला त्रास, त्यामुळे एसटी नेहमी तोट्यात असणार व प्रवासी जनता घटणार आहे.
- महेश कदम, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा प्रवासी वाहतूक संघटना