

पिंपरी: 'डिजिटल इंडिया'चा नारा देत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सर्व बसमध्ये 'यूपीआय' आणि 'क्यूआर कोड'द्वारे तिकीट देण्याची सुविधा सुरू केली; मात्र गेल्या काही दिवसांपासून या सुविधेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण लागले असून, बसवाहकांकडून ऑनलाइन पेमेंट घेण्यास नकार दिला जात आहे. 'सर्व्हर डाउन आहे' किंवा 'नेटवर्क नाही,' अशी कारणे पुढे करून प्रवाशांना रोखीने तिकीट काढण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वादावादीचे प्रसंग ओढवत आहेत.
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आधुनिक इटीआयएम मशीन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या माध्यमातून तिकिटाचे पैसे थेट बँक खात्यातून देण्याची सोय झाल्याने खिशात रोकड ठेवण्याची गरज उरली नव्हती. या सुविधेला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला असून, महिन्याकाठी ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न क्यूआर कोडच्या माध्यमातून मिळत होते.
मात्र, आता हीच यंत्रणा कोलमडताना दिसत आहे. सध्या एसटीचा उन्हाळी हंगाम सुरू असून महामंडळाने हंगामी भाडेवाढही लागू केली आहे. नागरिक सुट्ट्यांच्या निमित्ताने गावी किंवा पर्यटनासाठी जात आहेत. लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी तिकिटाचे दर जास्त असल्याने प्रवासी मोठी रोकड सोबत ठेवत नाहीत. अशा वेळी ऐन प्रवासात वाहकाने ऑनलाइन पैसे घेण्यास नकार दिल्यास प्रवाशांची मोठी गोची होत आहे.
वाद अन् मनस्ताप
रोखीने व्यवहार करताना १०, २० किंवा ५ रुपयांच्या सुट्ट्या पैशांवरून बसमध्ये दररोज वादाचे प्रसंग घडत आहेत. वाहकांकडे सुट्टे पैसे नसतात आणि प्रवाशांकडेही डिजिटल सोय असल्याने ते रोकड बाळगत नाहीत. यावरून होणाऱ्या शाब्दिक चकमकींमुळे प्रवासाचा आनंद विरघळत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. डिजिटल पेमेंटची सोय प्रवाशांच्या अंगवळणी पडली असताना तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा रोखीचे व्यवहार वाढले आहेत.
आम्ही ऑनलाइन पेमेंटवर अवलंबून असतो. बसमध्ये चढल्यावर वाहक 'कॅश द्या' म्हणतात, तेव्हा मोठी समस्या निर्माण होते. एसटी प्रशासनाने तातडीने या तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात आणि डिजिटल पेमेंट घेण्याचे आदेश वाहकांना द्यावेत.
जयश्री काळे, प्रवासी.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये विविध सवलती आहेत. त्यामुळे प्रवाशांचा ओढा एस.टी. कडे असतो. एसटी डिजिटल सेवेकडे वळली आहे; परंतु काही वेळेस नेटवर्कच्या समस्या निर्माण होत असल्याने प्रवाशांना डिजिटल व्यवहार करताना अडथळा निर्माण होत आहे.
वैशाली कांबळे स्थानक प्रमुख वल्लभनगर आगार