

पुणे: विद्यापीठात गॅसटंचाईमुळे फूडमॉल तसेच अनेक खानावळी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर, विद्यापीठाच्या कुलसचिवांनी पत्र काढत गॅसपुरवठ्याबाबत निश्चिंत राहण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, विद्यार्थी संघटनांनी मात्र विद्यापीठाने काय उपाययोजना केल्या? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात सीएनजी आणि एलपीजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती वापरासाठी पीएनजी पुरवठा टिकवून ठेवण्याची काळजी म्हणून सरकारने औद्योगिक क्षेत्राला गॅसपुरवठा कमी केला आहे. संबंधित सर्व परिस्थितीचा विपरीत परिणाम जवळपास 5 हजार रहिवासी विद्यार्थी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील खानावळी व उपाहारगृहांवर झाला आहे.
विद्यापीठातील खानावळींमध्ये भोजन घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, अन्न व नागरी पुरवठा व ग््रााहक संरक्षण विभाग यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना 100 टक्के गॅस सिलिंडरचे वाटप करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
तसेच, या अनुषंगाने विद्यापीठाकडूनही जिल्हाधिकारी पुणे जिल्हा यांना देखील पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे. याबरोबरच विद्यापीठातील भोजनगृहांमध्ये अन्नपुरवठा करण्यासाठी विद्यापीठस्तरावर पूर्णक्षमतेने प्रयत्न करण्यात येत असून, भोजनगृहांमध्ये भोजन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबत निश्चिंत राहावे, असे आवाहन विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांनी केले आहे.
विद्यापीठ परिसरातील भोजनगृहांमधील अन्नपुरवठ्याबाबत प्रभारी कुलसचिवांनी एक जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की, गॅसटंचाईवर विद्यापीठस्तरावर संपूर्ण क्षमतेने प्रयत्न करण्यात येत असून, भोजनगृहांमध्ये भोजन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबत निश्चिंत राहावे. प्रश्न हा आहे की, नेमकी कोणत्या प्रकारची उपाययोजना विद्यापीठ प्रशासनाने केली आहे, याची स्पष्टता नाही. हळूहळू सर्व मेस, उपाहारगृहे आणि भोजनगृहांमध्ये अन्नपदार्थ कमी केलेले आहेत. यावर पर्याय काय आहे?
राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती