पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात चालू वर्षी पाणी उपलब्धता मुबलक असूनही रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारीच्या पेरणी क्षेत्राने सरासरीसुध्दा गाठलेली नाही. ज्वारीचे सरासरी क्षेत्र 17 लाख 36 हजार 286 हेक्टर असताना 2 डिसेंबरअखेर 11 लाख 4 हजार 550 हेक्टरइतके म्हणजे सुमारे 64 टक्केच पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊन आगामी काळात ज्वारीची भावभाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, हरभर्याची विक्रमी पेरणी झालेली आहे.
राज्यातील रब्बी हंगामातरी क्षेत्र 54 लाख 29 हजार 101 हेक्टरइतके आहे. त्यापैकी 38 लाख 36 हजार 375 हेक्टरवर म्हणजे सरासरी क्षेत्राशी तुलनात करिता 70.66 टक्क्यांइतक्या क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले. गव्हाची 47.21 टक्के तर हरभर्याची 89.27 टक्क्यांइतकी पेरणी पूर्ण झालेली आहे. खरीपात सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा पेरा सर्वोच्च असे चित्र सातत्याने वाढू लागले आहे.
राज्यात रब्बी हंगामात हरभरा क्षेत्र चांगले दर मिळत असल्यामुळे वाढत आहे. शिवाय कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने व उत्पादनखर्च गव्हापेक्षा कमी येत असल्याने शेतकर्यांचे प्राधान्य हरभरा पीक घेण्यास आहे. ज्वारीची पेरणी प्रामुख्याने सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात होते. या दोन्ही महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे जमिनीला पेरणीयोग्य अपेक्षित वापसाच नव्हता. जनावरांची संख्या कमी होत असल्याने कडब्याला मागणी कमी राहते. त्यामुळे शेतकरी ज्वारी पिकापासून हरभर्याकडे वळत आहेत.
विनयकुमार आवटे, कृषी सहसंचालक व
मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे.
रब्बी हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी स्थिती : क्षेत्र हेक्टरमध्ये
पिके सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरलेले क्षेत्र टक्केवारी
रब्बी ज्वारी 17,36,286 11,04,550 63.62
गहू 10,85,012 5,12,229 47.21
मका 2,61,542 1,86,483 71.30
हरभरा 21,58,270 19,26,615 89.27
रब्बी तेलबिया 56,085 31,041 55.35