सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : चालू गाळप हंगामात जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा साखर उतारा चांगला राहिला आहे. कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 11.16 टक्क्यांवर आहे. तर 11. 84 टक्के साखर उतारा मिळवत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांत अग्रेसर असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. सर्व कारखान्यांनी मिळून 1 कोटी 6 लाख 6 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 कोटी 10 लाख 72 हजार 335 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. बारामती अॅग्रो या खासगी कारखान्याने 20 लाख 68 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून 18 लाख 87 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
दौंड शुगर कारखाना दुसर्या क्रमांकावर, तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 11 लाख 84 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून जवळपास 14 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. सोमेश्वर कारखाना चालू गाळप हंगामात जवळपास 14 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा अंदाज आहे. कारखान्याचा गाळप हंगाम 15 एप्रिलपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे.
सोमेश्वर कारखाना
माळेगाव कारखाना
छत्रपती कारखाना
जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांपेक्षा ऊस गाळपात खासगी कारखान्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी पडलेला अत्यल्प पाऊस यामुळे अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी अनेक साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र होते. मात्र, चालू हंगामात जानकरांचे अंदाज फोल ठरवत उसाचे जादा टनेज बसू लागल्याने कारखान्यांच्या ऊस गाळपास विलंब होत आहे. साखर कारखाने एक नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने आणि कारखान्यांनी गेटकेन उसावर जादा भर दिल्याने सभासदांचे ऊस अजून शेतातच उभे आहेत.
वेळेत ऊस गाळपास न गेल्यामुळे गहू अथवा इतर पिके शेतकर्यांना घेता आली नाहीत. पर्यायाने शेतकर्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. यावर्षी आडसाली ऊस संपविण्यासाठी कारखान्यांना मार्च महिना उजाडला आहे, त्यामुळे हंगाम संपविण्यासाठी साखर कारखान्यांना 15 एप्रिल उजाडण्याची चिन्हे आहेत. सध्या साखरेला चांगले दर असल्याने बँकांनी साखरेचे मूल्यांकन चांगले केल्याने एफआरपीसाठी कारखान्यांना पैशांची जास्त जुळवाजुळव करावी लागणार नाही. चालू हंगाम उशिरा सुरू झाल्याने व थंडीचे प्रमाण चांगले असल्याने उसाचा गोडवा वाढला आहे. सध्या मार्च महिना सुरू असूनदेखील रात्री थंडीचे प्रमाण चांगले असल्याने या वर्षी सर्वच साखर कारखान्यांचे साखर उतारे चांगले मिळत आहेत.
हेही वाचा