महत्त्वाची बातमी ! तलाठी भरतीत राज्यासाठी एकच प्रश्नप्रत्रिका ; साडेचार हजार पदांसाठी होणार परीक्षा

महत्त्वाची बातमी ! तलाठी भरतीत राज्यासाठी एकच प्रश्नप्रत्रिका ; साडेचार हजार पदांसाठी होणार परीक्षा

Published on
पुणे : पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागाच्या वतीने राज्यातील रिक्त असलेल्या चार हजार 464 तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे. विशेष म्हणजे एका परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे.
तलाठी संवर्गातील क गटातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास परवानगी दिली आहे. तलाठी भरती संदर्भातील प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. राज्यात एकूण चार हजार 464 तलाठ्यांची पद रिक्त असून, त्यासाठी ही भरती होणार आहे. राज्याच्या जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाने येत्या 20 जूनपासून भरतीसाठी लिंक खुली करण्याची परवानगी शासनाला मागितली आहे. लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
आजपर्यंतच्या तलाठी भरती परीक्षांमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यंदा भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम टीसीएस कंपनीला दिले आहे. तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेकरिता अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.
भरती परीक्षाकरिता लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करता 21 दिवसांचा मुदत कालावधी असणार आहे. राज्यभरातून किमान पाच लाख विद्यार्थी उमेदवार ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया करून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.
किती असेल परीक्षा शुल्क
नोकर भरती करताना पूर्वी 300 ते 500 रुपयांच्या आत शुल्क असत. परंतु तलाठी परीक्षेसाठी अर्ज करणार्‍या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.
एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे, बँकिंगच्या परीक्षांनासुद्धा एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारले जात नाही. मात्र, राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांची एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून, ही आर्थकि लूट आहे. हे शुल्क कोणाच्या फायद्यासाठी आहे. सरकार परीक्षा घेणार्‍या कंपन्यांना पुढे करून विद्यार्थ्यांना लुटत आहे.  
                                                                                        – महेश  घरबुडे, विद्यार्थी प्रतिनिधी, पुणे.
पुणे विभागात होणार 529 कोतवालांची भरती
राज्य शासनाने विशेष बाब म्हणून मंजूर रिक्त पदांची 80 टक्के पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पुणे महसूल विभागातील कोतवालांची 529 रिक्त पदांची भरती 15 ऑगस्टपूर्वी केली जाणार आहे.
 विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोतवालांची 2 हजार 476 पदे असून, त्यापैकी 529 पदे रिक्त आहेत.  रिक्त पदांपैकी किमान 80 टक्के पदे ही भरली जावीत. त्यासाठी जिल्हा निवड समितीमार्फत प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली करावयाची आहे. पुणे जिल्ह्यात कोतवालांची 119 पदे, सातारा -147, सांगली -74, सोलापूर- 77 आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील 84 पदे रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी जिल्हास्तरावर जाहिरात आणि कार्यवाही केली जाणार आहे.
शासनाने विशेष बाब म्हणून कोतवाल भरतीला परवानगी दिली आहे. पुणे विभागातील रिक्त जागांचा तपशील निश्चित करण्यात आला असून, जिल्हाधिकार्‍यांमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाईल.
                                                                                 – रामचंद्र शिंदे,   विभागीय उपायुक्त (महसूल)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news