

मंचर: लोकसंपर्काच्या जोरावर मी पुन्हा येणार असून, 2029 मध्ये लोकांना वाटले, तर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्यात चुकीचे काय आहे, असा सवाल ’म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी (दि. 8) उपस्थित केला. लांडेवाडी येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला.
मागील 20 वर्षांच्या राजकारणात एक रुपया खाल्ल्याचा आरोप माझ्यावर झाला नाही. खासदार नसताना देखील मंचर नगरपंचायतीसाठी 100 कोटींचा निधी आणला आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 136 कोटी रुपये मंजूर करून आणले. मात्र, काही जण मंचर नगरपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताहेत. (Latest Pune News)
या कामाची निविदा निघून ती पूर्ण होत आली आहेत. मग आत्ताच भ्रष्टाचाराचा आरोप कसा होतो, असा सवाल केला. निवडणुका लवकरच होणार आहेत. काम करणार्या एका ठेकेदाराने मला सांगितले की संबंधितांनी ठेकेदाराकडे 10 लाख रुपयांची मागणी केली होती. ते न दिल्यानेच भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. अशा बोलण्याला मी किंमत देत नाही, असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
मी राजकारणात सक्रिय आहे. दररोज लोकांना भेटतो, रविवारी जनतादरबार नित्यनेमाने सुरू आहे. गावागावांमधील विकासकामांसाठी निधी दिला जातोय. मी सक्रिय राहणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा पाठपुरावा केला जात नाही.
विशेषत: 2019पासून पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे, असे सांगून पाठपुरावा का होत नाही हे जनतेला समजले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याची आमची भूमिका आहे. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. मात्र, ग्रामीण भागात युती होईल, असे वाटत नाही.
वरिष्ठ जो निर्णय घेतील, त्यानुसार काम करणार असल्याचे ते म्हणाले. ’म्हाडा’मार्फत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. जे काम सुरू आहे, ते सुरू ठेवण्याचा संकल्प वाढदिवसा निमित्त केला असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.
...मी घरी बसलेलो नाही
लोकसभेतील पराभवानंतरही मी राजकारणात व सामाजिक जीवनात सक्रिय आहे. सर्वसामान्य लोकांना भेटतो, जनतादरबारात समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. गावागावांमध्ये विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत आहे. माझा पराभव जरी झाला असला, तरी मी घरी बसलेलो नाही, असेही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.